संघटीतपणे लढा लढण्याचा शेतकऱयांचा निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर हा खटला दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केला आहे. आता बेळगावमधील दिवाणी न्यायालयातच हा लढा आम्हाला लढायचा असून यापुढेही आम्ही संघटीतपणेच लढा लढणार असल्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे.
हलगा-मच्छे बायपासमधील शेतकऱयांनी बैठक घेऊन हा निर्धार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्यापासूनच शेतकऱयांची दिशाभूल केली आहे. नोटिफिकेशन चुकीचे काढून चुकीच्या ठिकाणाहून रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, शेतकऱयांनी लढा देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हिसका दाखविला आहे. शेतकऱयांचे पारडे जड आहे. ऍड. रवि गोकाककर यांनी युक्तिवाद करून शेतकऱयांना दिलासा दिला आहे. याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
हलगा-मच्छे बायपास करताना झिरो पॉईंट ते मच्छे असे नोटिफिकेशन करण्यात आले होते. झिरो पॉईंट हा फिशमार्केटजवळ असल्यामुळे अलारवाडपासून मच्छेकडे रस्ता करणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. नोटिफिकेशनमध्ये तफावत असल्याचे पहिल्यापासूनच शेतकऱयांनी सांगितले असताना देखील शेतकऱयांच्या जमिनी दडपशाहीत हिसकावून घेण्यात आल्या होत्या.
उच्च न्यायालयाने शेतकऱयांची बाजू उचलून धरत न्याय दिला आहे. मात्र, आता दिवाणी न्यायालयात हा खटला लढावा लागणार आहे. त्यासाठी संघटीतपणेच यापुढे हा लढा लढण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. यावेळी रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मरवे, शहर अध्यक्ष हनुमंत बाळेकुंद्री, सचिव भूमेश बिर्जे, सुभाष चौगुले, रमाकांत बाळेकुंद्री, तानाजी हलगेकर, लक्ष्मण देमजी, भैरू कंग्राळकर, महेश चतुर, नितीन पैलवान, शंकर बाळेकुंद्री, मनोहर माळवी, विनायक हलगेकर, गोपाळ सोमणाचे, भालचंद्र सनदी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.