कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. पर्यटन स्थळांवरही पर्यटक येऊ लागले आहेत. उत्साही वातावरण असल्यामुळे यावर्षीची दिवाळीही झगमगून जाणार आहे. मात्र कोकणात अजूनही साडेचारशे कोरोना बाधित ऍक्टीव्ह रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्ही रेट राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे धोका संपलेला नसून दिवाळी साजरी करताना सावधानता हवीच.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी आणि यावर्षीही दिवाळीपर्यंतचे सर्व सण, उत्सव आपण नियम आणि निर्बंध पाळून साजरे केले. खऱया अर्थाने ते साजरे झाले नाहीत. कारण कोरोनाचे सावट आणि वाढता संसर्ग. परंतु, मागील काही महिन्यांपासून परिस्थिती नियंत्रणात व समाधानकारक असल्यामुळे एकूणच राज्य शासनाने सर्व व्यवहारात शिथिलता जाहीर केली आहे. कमी होणारी रुग्णसंख्या आणि जवळपास 98 टक्क्यांपर्यंत गेलेला रिकव्हरी रेट बघता मंदीर, प्रार्थनास्थळे ही सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्यात आली.
कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या शाळा-कॉलेजांना दिवाळीची सुट्टी आहे. वातावरणही प्रफुल्लित होत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी संयमाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसादही मिळत असून दिवाळीचा झगमगाट सुरू झाला आहे.
कोरोनाच्या लाटेनंतर देशाबरोबरच कोकणातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. गेल्यावर्षी मार्चपासून सुरू झालेले लॉकडाऊन गेल्या वर्षाच्या दिवाळीत अंशतः उठवण्यात आले होते. यावर्षी मात्र गतवर्षाच्या तुलनेत दिवाळीचा उत्साह सर्वत्र जाणवत आणि दुणावतसुद्धा आहे. सर्वांनाच मांगल्याची, तेजाची आस कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या सर्वांनाच लागलेली आहे. त्यामुळे ही दिवाळी सर्व जनतेच्या जीवनात आनंद, उत्साह निर्माण करेल, यात शंका नाही. मात्र दिवाळीचा सण साजरा करताना कोरोनाचा धोका संपलेला नाही, याचे भानही ठेवायला हवे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्य शासनाने निर्बंध शिथील केले. त्यामुळे आता लोकांची बाजारपेठांमधून गर्दी दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे घरी थांबून कंटाळलेले लोक आता बाहेर पडू लागले आहेत. पर्यटन स्थळावरही पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात येईल, अशी शक्यता होती. परंतु, सुदैवाने कोरोनाची तिसरी लाट अजून आली नाही आणि यापुढेही नाही आली तर चांगलेच आहे. कोरोनाची तिसरी लाट आली नाही किंवा निर्बंध शिथील केले असले, तरी आता कोरोनाची भीती नाही म्हणून निर्धास्त राहणे महागात पडू शकते. विशेषतः कोकणात कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे, याबाबतची सावधानता बाळगली पाहिजे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळेच निर्बंध शिथील केले. परंतु, मास्क घालण्याबाबत निर्बंध कायम आहेत. त्याचे पालन गर्दीत जाताना तरी करायला हवे. राज्य कोरोना नियंत्रणात आहे. रिकव्हरी रेटही 98 टक्क्यांपर्यंत गेला आहे. राज्यातील बऱयाच जिल्हय़ांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, तर काही जिल्हय़ांत अगदी कमी रुग्ण आहेत. दोन्ही जिल्हय़ांत दररोज पंधरा-वीस रुग्ण आढळत आहेत. सक्रिय रुग्णसंख्यासुद्धा अधिक आहे. रत्नागिरी जिल्हय़ात 148 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 288 सक्रिय रुग्ण आहेत. दोन्ही जिल्हय़ांत साडेचारशेच्या दरम्यान सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या आढळणे थांबलेले नसल्याने संपूर्ण राज्यात पॉझिटिव्हीटी रेटमध्ये कोकण पहिल्या क्रमांकावर आहे.
दोन्ही जिल्हय़ांत रुग्ण आढळण्याचे दररोजचे प्रमाण हे पंधरा ते वीस असल्यामुळे ते कमी दिसत असले, तरी कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याचे स्पष्टच होत आहे. कोरोना चाचण्या वाढवल्या असत्या, तर कदाचित रुग्ण संख्याही वाढली असती. त्यामुळे कोकणातील कोरोना अजूनही कमी झालेला नसून धोका कायम आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध शासनाने शिथील केले असले, तरी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सावधानता हवीच. गेले दीड वर्ष सातत्याने लॉकडाऊनच्या बेडीत अडकून सर्वच जनता त्रस्त झालेली आहे. अनेक लोकांची रोजगाराची साधनेही गेली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणे कुणालाच परवडणारे नाही. शाळा, कॉलेजीससुद्धा सुरू झाली आहेत. आता दिवाळी सणासाठीही उत्साही वातावरण आहे. दिवाळी म्हटली की, मोठय़ा प्रमाणावर खरेदी विक्री आली. मग काय आनंद व उत्साहाला सीमाच राहत नाही. मोठे मोठे मॉल्स, रिटेल दुकानदार हॉटेल्स, कपडे, फटाके, सजावटीचे साहित्य, किराणा माल, कंदील, दिवे, पणत्या, या सारख्या गोष्टींच्या खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडालेली दिसू लागली आहे.
कोरोना लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ाने आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात आठ लाख लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. तर रत्नागिरी जिल्हय़ात तेरा लाखाच्यावर लोकांना लस दिली आहे. दोन्ही जिल्हे लसीकरणामध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ही रेटमध्ये कमी येऊ शकतो. मात्र जनतेने अजूनही निर्धास्त न राहता धोका ओळखला पाहिजे. डिसेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते साध्य झाल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो आणि दिवाळीप्रमाणे आगामी काळातील सर्व सण उत्साहात साजरे करता येणे शक्मय आहे.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यावर्षीची दिवाळी मोठय़ा उत्साहात झगमगून निघणार आहे. मात्र उत्साह, आनंद कायम राहावा, यासाठी आपल्याला भान हरवून चालणार नाही. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर स्वयंस्फूर्तीने करून जबाबदारीने वागणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. निर्बंधातून परत बंधनात अडकायचे नसेल, तर सर्वांनी खबरदारी घेऊन दिवाळी साजरी करुया.
संदीप गावडे