दिवाळीसाठी लागणाऱया साहित्याबरोबर फराळाच्या मागणीत वाढ
बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने दिवाळीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. विशेषकरून दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. शनिवारी बाजाराच्या दिवशी दिवाळी साहित्याबरोबरच दैनंदिन खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. दिवाळीसाठी लागणारे आकाशकंदील, पणत्या, मेणबत्या, रांगोळी, रांगोळीचे विविध डिझाईन्स व छाप, कापूस, वाती, अत्तर, उटणे, मातीचे दिवे, देवीचे मुकुट, तोरण, शुभ-लाभ, लक्ष्मीची पावले आदी साहित्यांनी दुकाने सजली आहेत. दिवाळीत फराळाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे फराळाच्या दुकानांतून पोहे व इतर फराळाच्या साहित्यांची मागणी वाढलेली आहे. शहरातील मारुती गल्ली, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
बाजारात दिवाळी साहित्यांची विक्री करण्यासाठी विविध ठिकाणी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. काही दुकानांतून या साहित्यांची विक्री होताना दिसत आहे. दिवाळीत लागणाऱया लहान पणत्यांच्या किमती 20 रुपयांपासून 180 रु. डझन या दरात आहेत. मातीच्या पणती खानापूर तर इतर पणती गुजरात, दिल्ली येथून उपलब्ध झाल्याचे एका विपेत्याने सांगितले. विविध रंगांमध्ये रांगोळी उपलब्ध असून 10 रुपयांना 4 ग्लास व 10 रुपये पाकीट अशी विक्री होत आहे.
फराळाला मागणीदेखील वाढलेली आहे. विशेषकरून कच्चे पोहे 50 रु. किलो, भाजके पोहे 50 ते 60 रु. किलो, शेंगा 100 ते 110 रु. किलो, फुटाणे 90 ते 100 किलो दराने विक्री होत आहे. फराळाचे दर स्थिर असल्याचे विपेत्याने सांगितले.
भाजीपाल्याचे दर स्थिर
दिवाळीच्या सणाबरोबरच शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची विक्री तेजीत असून दर स्थिर असल्याचे दिसून आले. मुळा 20 रु. 4 नग, मेथी 20 रु. जुडी, पालक 20 रु. जुडी, शेपू 20 रु. जुडी, लालभाजी 20 रु. जुडी, ढबू मिरची 80 रु. किलो, टोमॅटो 40 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, वांगी 80 रु. किलो, भेंडी 80 रु. किलो, गाजर 80 रु. किलो, गवार 80 रु. किलो अशी किरकोळ भाजी विपेत्यांकडे विक्री होत होती.
बाजारात विनामास्क फिरणारे अधिक
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, रविवारपेठ आदी ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडत आहे. खरेदीसाठी आलेले नागरिक विनामास्क बाजारात फिरताना दिसत आहेत. कोरोना अद्याप संपला नसून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.