भारतीय सामग्रींचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यावर जनतेचा भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या संकटादरम्यान यंदाचा दिवाळी सण पूर्णपणे वेगळय़ा स्वरुपात देशभरात साजरा करण्यात येत आहे. यात चिनी उत्पादनांवर बहिष्कार, भारतीय सामग्रींचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यावर भर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या घोषणेला कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) नेतृत्वात देशभरातील व्यापाऱयांनी अंमलात आणले आहे.
यंदा दिवाळीदरम्यान देशभरातील बाजारपेठांमध्ये झालेली उल्लेखनीय विक्री भविष्यातील चांगल्या व्यापारी शक्यतांचे संकेत देतात. देशातील 20 शहरे पुरवठा साखळीतील महत्त्वाची केंद्रे आहेत. या शहरांमधून प्राप्त अहवालानुसार देशभरात सुमारे 72 हजार कोटींची उलाढाल झाली असून चीनला थेट स्वरुपात 40 हजार कोटी रुपयांची व्यापारी हानी झाल्याची माहिती कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.
20 प्रमुख वितरण केंद्रे असलेल्या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सूरत, कोची, जयपूर, चंदीगडचा समावेश आहे. किरकोळ व्यापाराच्या आघाडीवर विक्री चांगली राहिल्याचे कॅटकडून सांगण्यात आले आहे. घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला या विक्रीमुळे चांगलेच बळ प्राप्त होणार आहे.
देशाचे व्यापारी आणि लोकांनी अत्यंत दृढपणे चीनला 40 हजार कोटी रुपयांचा व्यापाराचा झटका दिला आहे. भारताला डम्पिंग ग्राउंड समजू नये, असा संदेश यातून चीनला मिळाला आहे. यंदाच्या दिवाळीत मोठय़ा संख्येत स्थानिक कारागिर, मूर्तीकार, हस्तशिल्पकार तसेच कुंभारांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाल्याचे भरतिया यांनी सांगितले आहे.