चिपळुणातील चित्र, व्यापारी चिंतेत, सणाच्या दोन दिवस आधी व्यापार होण्याची आशा
राजेश जाधव/ चिपळूण
दिवाळीचा सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना येथील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे आधीच विविध कारणांमुळे संकटात असलेला व्यापारीवर्ग चिंतेत आला आहे. सणाच्या दोन दिवस आधी व्यापार होण्याची त्यांना आशा आहे. विशेष म्हणजे महागाईच्या काळातही सध्या तेल दर काहीसा थंडावला असून चांदण्या, कंदील, पणत्या यांच्या दरात घसरण झाली आहे. मात्र 10 ते 15 टक्के दर वाढल्याने फटाके गरम झाले आहेत.
2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. त्या दिवसापासून दिवाळीस सुरूवात होते. त्यामुळे फराळ बनवण्यासह सजावट करण्यासाठी दरवर्षी दिवाळीच्या 15 दिवस अगोदर किरकोळ प्रमाणातही का होईना खरेदीला सुरूवात होते. मात्र यावर्षी चित्र थोडे उलटे दिसत आहे. दिवाळी 6 दिवसांवर आली तर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. याला सध्या जोरात सुरू असलेली भातकापणी व कोरोना, महापूर ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. व्यापाऱयांच्या अनुभवानुसार दिवाळीची खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ती झाली नसल्याने व्यापाऱयांची चिंता वाढली आहे. तरीही सणाच्या दोन दिवस आधी गर्दी होण्याची आशा व्यापारीवर्गाला आहे. त्यानुसार दुकाने सज्ज केली जात आहेत.
तेल दराने झालेय थंड
काही महिने मागे जाता तेलाच्या किमती कडाडल्या होत्या. पिशवीमागे 30 ते 40 तर डब्यामागे 100 ते 150 रूपये वाढले होते. त्यामुळे कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाली असतानाही ग्राहकांना महागडे तेल खरेदी करावे लागत होते. त्यामुळे दिवाळीत हे दर आणखीनच वाढतील असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात जितके दर वाढले होते त्यापेक्षा काहीपटीने दर सध्या कमी झाले आहेत. सध्या विविध कंपन्यांचे तेल 140 रूपयांपासून 170 रूपये लिटरने मिळत आहे, तर डब्यामागे 150 रूपये ते 175 रूपये कमी झाले आहेत. याचबरोबर सध्या पातळपोहे 50 रूपये, खोबरे 190 रूपये, मैदा 34 रूपये, रवा 36 रूपये, पिठीसाखर 46 रूपये किलो दराने मिळत आहे.
चांदण्या, कंदील, पणत्यांचे दर घसरले!
सध्या विविध रंगाच्या चांदण्या, कंदील, पणत्यांनी बाजारपेठ सजवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी या सर्व साहित्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या कंदील 50 रूपयांपासून 500 रूपयांपर्यंत, लहान कंदील 50 ते 60 रूपये डझन, चांदण्या 50 रूपयांपासून 250 रूपयांपर्यंत, पणत्या 30 ते 50 रूपये डझन, रांगोळय़ा 5 रूपये, 10 रूपये, 20 रूपये किलो या दराने विकल्या जात आहेत. दिवाळीतील किल्ल्यांचे रक्षण करण्यासाठी मावळेही सज्ज झाले असून ते 10 रूपयांपासून किल्ला व शिवाजी महाराजांची मूर्ती 500 रूपयांना विकली जात आहे.
फटाक्यांचे दर कडाडले!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फटाक्यांच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत नियमित चक्र, पाऊस, फुलबाजे, फटाके, माळी व काही फॅन्सी फटाके उपलब्ध करण्यात आले आहेत. ते 50 रूपयांपासून 100 रूपयांपर्यंत विकले जात आहेत. विशेष म्हणजे फटाके वाजवण्याला परवानगी आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे व्यापाऱयांनीही सावध भूमिका घेतली असून कमी प्रमाणातचे माल आणला आहे, तर बाजारपेठ पावलोपावली दिसणारी फटाक्यांची दुकानेही यावर्षी दिसून येत नाहीत.
अजून खरेदी नाही
याबाबत बोलताना पी. एस. रेडीज ऍण्ड सन्सचे मालक श्रीकृष्ण उर्फ बाबा रेडीज म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही फटाके, कंदील, चांदण्या, पणत्या आदी साहित्य उपलब्ध केले आहे. मात्र तितक्याशा प्रमाणात खरेदी होताना दिसत नाही.
व्यापार होईल
सध्याच्या बाजारपेठेतील शुकशुकाटाबाबत बोलताना शीतल पान शॉपचे मालक शीतल देवळेकर म्हणाले की, फटाके व अन्य साहित्याने आम्ही दुकाने सज्ज ठेवली आहेत. अजूनही ग्राहकांनी खरेदीला सुरूवात केलेली नाही. मात्र सणाच्या दोन दिवस आधी मोठय़ाप्रमाणात खरेदी होईल असे वाटते.