ऑनलाईन टीम / पुणे :
निसर्गाने आपल्याला परिपूर्ण उत्तम शरीर दिले आहे. त्याच्याइतकी परफेक्ट ऑर्गनायझेशन नाही. एक अवयव नाही दिला, तर आपल्याला अडचण होते. पण एक शक्ती नसेल तर निसर्ग दुसरी शक्ती देऊन भरपाई करतो. म्हणून आपण त्यांना अपंग नाही दिव्यांग म्हणायला हवे. कारण त्यांच्याकडे दिव्य शक्ती असते. असे मत ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
हँडीकॅप वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने नवी पेठेतील पत्रकार भवन येथे जनसज्जन समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी निरंजन सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. नवनीत मानधनी यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षणतज्ञ प्रा.डॉ. सुधाकर जाधवर, फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मोहोळ उपस्थित होते.
प्रा. डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, समाजामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन समाजाच्या कल्याणाचे काम करणा-या चांगल्या लोकांना हेरले आणि त्यांचा सत्कार केला, हे वेगळे काम आहे. कोणीतरी दखल घेतल्यानंतर आपण देखील काहितरी काम केले आहे आणि आणखी काम केले पाहिजे, असे प्रोत्साहन आपल्याला मिळते. तसेच आणखी जोमाने समाजाचे काम करण्याची प्रेरणा मिळते.
डॉ. नवनीत मानधनी म्हणाले, मला मिळालेल्या पुरस्काराने माझ्या कार्याची दखल घेण्यात आली, याचा मला आनंद आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून यापुढेही मी माझे सामाजिक कार्य अधिक जोमाने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.