केंद्रावर जाऊ न शकणाऱयांना घरी मिळणार लस : सरकारचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या तिसऱया लाटेच्या भीतीदरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिव्यांग आणि आजारी लोकांना मोठा दिलासा दिला आहे. दिव्यांग आणि आजारी लोकांना लस घेण्यासाठी आता लसीकरण केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. दिव्यांग आणि आजारी लोकांना घरीच लस देण्यात येणार आहे. तसेच याकरता त्यांना कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.
जे लोक लसीकरण केंद्रावर जाण्यास सक्षम नाहीत, त्यांना घरीच लस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याकरता कुठेच अर्ज करण्याची गरज नाही. आमची लस सुरक्षित आहे. तसेच लसींना घरापर्यंत नेण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली सुरक्षित, प्रभावी असेल असा आम्हाला विश्वास आहे. या प्रक्रियेदरम्यान सर्व मापदंडांचे पालन केले जाणार असून याकरता आदेश काढण्यात आला आहे. या प्रक्रियेत स्थानिक पथके भाग घेतील अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
कोरोना लसीकरण केंद्रावर जाण्यास सक्षम नसलेल्या लोकांसाठी घरीच लसीकरण सुरू करत आहोत. लसीकरण केंद्रावर जाण्यास अक्षम असलेल्या लोकांना लस मिळेल हे सुनिश्चित केले जावे असे आदेशात म्हटले गेले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यासाठी विशेष व्यवस्था करावी असे पॉल यांनी नमूद केले आहे.
काही राज्यांमध्ये लसीकरणाप्रकरणी जबरदस्त काम झाले आहे. याचमुळे 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 66 टक्के लोकांना किमान एक डोस मिळालेला आहे. तर 23 टक्के लोकांना दोन्ही डोस प्राप्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
6 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी स्वतःच्या 100 टक्के प्रौढ लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे. यात लक्षद्वीप, चंदीगड, गोवा, हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटसमूह तसेच सिक्कीम सामील आहे. 4 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पहिला डोस देण्यात आला आहे. यात दादरा आणि नगर हवेली, केरळ, लडाख आणि उत्तराखंड सामील आहे.