सातारा / प्रतिनिधी :
2016 चा दिव्यांग कायदा सातारा जिल्ह्यात लागू करण्यात यावा, दिव्यांगाची क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात युआयडी कार्ड काढताना टक्केवारी कमी केली जाऊ नये, आदी विविध मागण्यांसाठी दि. 15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यचे अजय पवार यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राज्य शासनाने दिव्यांगाच्या हक्कासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या करारास लागू करण्यासाठी आणि त्या संबंधित किंवा प्रासंगिक गोष्टीकरता कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिव्यांगावर जुलूम होतात. त्याबाबत पोलिसांनी या कायद्याची अंमलबजावणी करुन त्यानुसार गुन्हा दाखल करुन घेणे गरजेचे असताना तसा गुन्हा दाखल केला जात नाही. दरम्यान, शासनाने दिव्यांगाकरता युआयडी कार्ड आणले आहे. हे युआयडी कार्ड काढत असताना दिव्यांगांची टक्केवारी कमी केली जात आहे. टक्केवारी कमी केल्याने दिव्यांगाचा लाभ मिळत नाही. डॉक्टरांकडून 40 टक्के असलेला दिव्यांग एकदम 10 टक्क्यावर आणून ठेवत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच दि.15 रोजी आत्मदहन करणार आहोत, असा इशारा दिला त्यांनी दिला आहे.