प्रतिनिधी / पणजी
शेतकऱयांच्या आंदोलनाला जगभरातून समर्थन गोळा करण्यास झटणाऱया पर्यावरणवादी दिशा रवी या युवतीला दिल्ली सी.बी.आयच्या सायबर विभागाने बेंगळूर येथे जाऊन अटक केल्याने महिला काँग्रेसच्या वतीने प्रतिमा कुतिन्हो यांनी निषेध व्यक्त केला आहे.
पत्रकार परिषदेवेळी प्रतिमा कुतिन्हो यांच्या समवेत लालन पार्सेकर, पार्वती नागवेकर, आनरीया डायस, सपना गावठणकर, मुक्ता फोंडेकर या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतःला सर्वोच्च नेते समजतात व त्यांच्या विरोधात जाणाऱयांना कोणालाच ते माफ करीत नाहीत. आर.एस.एस. भाजप आणि मोदी मिळून भारत देश संपवणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी आंदोलनातील 200 शेतकऱयांचे निधन झाले आहे. त्याला मोदींना जबाबदार धरले पाहिजे, असे सांगताना या आंदोलनाने आता जागतिक स्वरुप साधले असून जगभरातून वाढता पाठींबा मिळत आहे. भाजप सरकार आता किती जणांचा आवाज दाबून ठेवणार ? असा प्रश्न त्यांनी केला.
पेट्रोल आणि स्वयंपाक गॅसची दरवाढ झाल्याने त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यावर आपण दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन भाष्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.