तीन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ मिळालेले ठरले पहिले पोलीस अधीक्षक : तीन वर्षांच्या कारकिर्दीत पोलीस यंत्रणा बनविली हायटेक
- तपासकाम, गुन्हे शाबित करण्यात सिंधुदुर्गला बनवले राज्यात अव्वल
- पोलीस कल्याणाची अनेक कामे, ‘जंटलमन’ची प्रतिमा बनवण्यात यश
शेखर सामंत / सिंधुदुर्गनगरी:
कोणाचीही हुजेरगिरी न करता आपल्या कामगिरीने सिंधुदुर्गच्या पोलीस इतिहासात सर्वाधिक कारकीर्द मिळविण्याचा बहुमान प्राप्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी नवा इतिहास रचला आहे. अतिशय शांत आणि नियोजनबद्ध काम करीत सिंधुदुर्गातील पोलीस सेवेला व्यावसायिक, हायटेक आणि समाजाभिमुख रुप देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. गुन्हय़ांचा शोध लावण्यामध्ये राज्याच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ाला राज्यात पहिल्या पाच क्रमांकात आणण्याची मोठी कामगिरी त्यांनी बजावली आहे. राजकीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया या जिल्हय़ात लोकसभा, विधानसभा व ग्रामपंचायत निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात यश त्यांनी मिळविले आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी लाखमोलाची कामगिरीही त्यांनी बजावली आहे. ही सर्व कामगिरी प्रसिद्धीपासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवून बजावली, हे विशेष.
काही अपवाद वगळता सिंधुदुर्गच्या पोलीसप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱया यापूर्वीच्या आयपीएस अधिकाऱयांना आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच हा जिल्हा सोडावा लागला. जिल्हय़ातील राजकीय असंवेदनशीलता हे त्यातील एक महत्वपूर्ण कारण होते. सिंधुदुर्गात एस. पी. म्हणून दाखल झालेल्या गेडाम यांनी 30 एप्रिल 2017 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. मागील एप्रिल महिन्यात त्यांनी सिंधुदुर्गातील कारकिर्दिची तीन वर्षे पूर्ण केली. सर्वसाधारणपणे पोलीस अधीक्षकांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळतो. या ठिकाणी गेडाम यांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला. आपल्या कारकिर्दीला कोणत्याही प्रकारचा डाग लावू न देता स्वच्छ व सुटसुटीत कारभार हे गेडाम यांच्या कारकिर्दीचे वैशिष्टय़ राहिले.
खाकी वर्दीतील जंटलमन
खरं तर अधीक्षक गेडाम यांचे व्यक्तिमत्व हे पोलीस दलातील ‘जंटलमन’ असेच काहीसे आहे. कधीही प्रसिद्धीच्या मागे न धावता शांतपणे आणि नियोजनबद्ध काम करणे, ही त्यांच्या कामाची खासियत राहिली आहे. खरं तर गेडाम यांनी सिंधुदुर्गच्या अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. एक तर हा जिल्हा राजकीयदृष्टय़ा अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जायचा. राजकीय नेत्यांबरोबर नाही जुळवून घेतले, तर बदली ही झालीच समजायची. त्याचप्रमाणे गुन्हेगारांचा शोध लावण्यात आणि गुन्हा शाबित करून त्यास शिक्षेस पाठविण्याच्या कामात सिंधुदुर्गचा क्रमांक अगदी तळापर्यंत घसरला होता. त्यामुळे या कामगिरीतही सुधारणा होणे अपेक्षित होते. एवढेच नव्हे, तर पोलिसांची कल्याण गंगाजळी म्हणजेच वेलफेअर फंड आटून अवघा दोन हजार एवढाच शिल्लक राहिला होता. पोलिसांच्या कार्यात सुसुत्रता आणणे हे देखील एक मोठे आव्हान होते. गेडाम यांनी आपल्या कारकिर्दितील पहिले तीन महिने केवळ अभ्यासात घालविले आणि त्यानंतर त्यांनी स्वत:च्या स्टाईलने काम सुरू केले.
पोलीस यंत्रणेला बनविले हायटेक
गेडाम यांनी सर्वप्रथम पोलीस तपासकामाचा टास्क हाती घेतले. तपास कसा करावा, केस कशी बनवावी, याचे मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱयांसाठी सुरू केले. उत्कृष्ट तपासकाम करणाऱया पोलिसांना रोख रकमेची बक्षिसे देण्यास सुरुवात केली. जिल्हय़ाचा सायबर सेल अद्ययावत करीत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात हातखंडा मिळवला. याचा परिणाम असा झाला की तपासकामाच्या बाबतीत राज्याच्या यादीत अगदी तळाला असलेला हा जिल्हा राज्यातील सर्व ग्रामीण जिल्हय़ांमध्ये पहिल्या क्रमांकावर आला. सर्वोत्कृष्ट तपासकामाचे अखिल भारतीय पातळीवर दिले जाणारे पारितोषिक देखील या जिल्हय़ाला प्राप्त झाले. जिल्हय़ातील पेट्रोलिंग करणाऱया सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवून घेण्यात आली. पोलीस चेकनाक्यांवर तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱयांचे जाळे उभारण्यात आले. पोलीस कार्यालये आय. एस. ओ. करण्यात आली. सर्व कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात आले. पोलीस बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच जिल्हय़ात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध ऍप्स बनविण्यात आली. थोडक्यात जिल्हय़ाची संपूर्ण पोलीस यंत्रणा हायटेक बनविण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून सिंधुदुर्गच्या पोलिसी कार्यपद्धतीत गतिमानता आणि व्यावसायिकता आणण्यात गेडाम यांना यश आले. सिंधुदुर्गातील त्यांची पोस्टिंग ही पोलीस अधीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग होती. तरीही फारसा अनुभव नसतानाही त्यांनी मिळविलेले यश हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल.
पोलीस कल्याण निधीत लाखो रुपयांची भर
सिंधुदुर्ग पोलिसांच्या कल्याणासाठी गेडाम यांनी केलेली कामगिरी तर थक्क करणारीच आहे. त्यांनी ज्या परिस्थितीत या जिल्हय़ाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी पोलीस कल्याण निधीच्या गंगाजळीत अवघे दोन हजार रुपये शिल्लक होते. ‘पोलीस कल्याणा’ची सर्व कामे अक्षरश: ठप्प झाली होती. पोलिसांना घरे मिळत नव्हती. कार्यालयांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नव्हते. गेडाम यांनी सर्वप्रथम पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. एखाद्या नाटकाचे वा ऑर्केस्ट्राचे आयोजन करीत तिकिटे लोकांच्या गळी मारून कल्याण निधी उभारणे त्यांना मान्य नव्हते. शाश्वत निधी उभारण्यावर त्यांचा कल होता. त्यांनी शासनाकडून विशेष परवानगी घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या मालकीचे ओरोस व कणकवली येथे दोन पेट्रोल पंप सुरु केले. या पेट्रोल पंपांच्या माध्यमांतून 2018-19 या एकाच वर्षात 67,30,000 एवढा नफा मिळविला. जो पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात आला. या रकमेतून पोलिसांसाठी अनेक कामे करण्यात आली. पोलीस कल्याणाच्या गंगाजळीत दर महिन्याला 5 लाख 60 हजाराची रक्कम जमा होऊ लागली.
पोलिसांसाठी गृह निर्माण प्रकल्प
पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांसाठी गृहनिर्माण प्रकल्प देखील त्यांनी उभारला. बाजारभावापेक्षा अल्प दराने पोलिसांना त्यांच्या स्वमालकीची घरे मिळाली. एकूण 40 अधिकारी व कर्मचाऱयाना या घरांचा लाभ झाला. जिल्हय़ातील पोलिसांची 17 कार्यालये अत्याधुनिक झाली. पोलिसांसाठी नवीन मैदानाची निर्मिती, अद्ययावत व्यायामशाळा, मैदानावर किल्ला प्रतिकृतीची उभारणी, शॉर्टरेंज फायर बटची निर्मिती, कर्मचारी वसाहतीचे नूतनीकरण, अशी अनेक कामे गेडाम यांनी आपल्या कारकिर्दित सुरू करून ती पूर्णत्वास देखील नेली.
पोलिसांच्या कार्यपद्धतीत कमालीची सुधारणा
गेडाम यांच्या कारकिर्दित जिल्हय़ातील पोलिसांच्या कार्यपद्धतीत एवढा बदल झाला की या तीन वर्षांत जिल्हय़ातील एकूण 33 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना सर्वोत्कृष्ट कामाबद्दल पोलीस महासंचालक पदके देऊन गौरविण्यात आले. हा देखील एक विक्रम ठरला आहे. गेडाम यांच्या या काळात आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा, पूर व वादळ, मंत्रिमंडळांची बैठक, निवडणुका, मुख्यमंत्र्यांचे दौरे, कोरोनाचे संकट इत्यादी काळ कसोटीच ठरला. मात्र या सर्वात यश मिळवण्यात त्यांनी यश मिळविले.