ज्येष्ट अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्या भावना : आठ दशकांच्या मैत्रीपूर्ण आठवणींना दिला उजाळा
प्रतिनिधी /निपाणी
1943 च्या सुमारास सिनेसृष्टीत पदार्पण करताना माझ्यासमोर असंख्य अडचणींचा डोंगर उभा होता. अशावेळी या अडचणींवर मात करण्याचे धाडस मला लतादीदींनी दिले. सुमारे 80 वर्षे आपली व लतादीदींची निखळ अशी मैत्री राहिली. एकीकडे रमेश देव यांच्या निधनाचा धक्का पचवत असतानाच लतादीदींच्या जाण्याचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे. आता यापुढील आयुष्यात आपल्याला लतादीदींच्या अजरामर अशा आवाजाचाच केवळ आधार आहे, अशा भावना हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील 93 वषीय ज्येष्ट अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी व्यक्त केल्या.
गेली अनेक दशके संगीतात लतादीदी व अभिनयात सुलोचनादीदी हे समीकरण जुळले होते. रविवारी लतादीदींच्या जाण्याने या दोघींच्या मैत्रीला नियतीने तडा दिला.
सुलोचनादीदी यांनी रविवारी ‘तरुण भारत’शी बोलताना लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, आपले मुळगाव खडकलाट. येथे प्लेगची साथ आल्यामुळे गाव सोडून चिकोडीला जावे लागले. येथे शेजारी असलेल्या बेनाडीकर वकील यांच्या घरी प्रख्यात दिग्दर्शक मास्टर विनायक यांचे येणे-जाणे होते. यातून बेनाडीकर वकीलांनी आपल्याला चित्रपटात संधी देण्याविषयी मास्टर विनायक यांना सुचवले. त्यानुसार 1943 मध्ये आपण कोल्हापूरात दाखल झालो. त्याच्या एक वर्ष आधीच लतादीदी या भालजी पेंढारकर व मास्टर विनायक यांच्या स्टुडिओत आल्या होत्या.
कोल्हापुरातून मैत्रीपर्वाला सुरुवात
माझ्या मराठी बोलण्याला काहीसे कानडी वळण होते. त्यामुळे आपल्या बोलण्याची अनेकदा थट्टा केली जात होती. याचवेळी अशी थट्टा करणाऱयांवर लतादीदी धावून जायच्या. स्टुडिओमध्ये मुख्य अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्रींसाठी स्वतंत्र खोल्या होत्या. मला याची कल्पना नसल्याने एकदा मी मुख्य अभिनेत्रीच्या खोलीत जाऊन बसले. याचवेळी त्यावेळच्या एका प्रख्यात अभिनेत्रीने आपल्याला तिच्या खोलीत बसलेले पाहून ओरडत खोलीबाहेर हाकलले. त्यामुळे एका झाडाखाली जाऊन मी रडत बसले होते. ही हकीकत समजल्यानंतर लतादीदी माझ्याजवळ आल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला हाताने ओढत नेत त्या मुख्य अभिनेत्रीच्या खोलीत नेऊन बसवले. यानंतर आपल्याला लतादीदींचा मोठा आधार वाटू लागला. इथूनच आमच्या दोघींच्या मैत्री पर्वाला सुरुवात झाली.
मुंबईतही मैत्री कायम
मैत्री वाढल्यामुळे माझे लतादीदींच्या घरी येणे जाणे सुरू झाले. त्यांच्या आईदेखील माझ्यावर प्रेम करत होत्या. अनेकदा तर आशाला (आशा भोसले) अंघोळ करणे, तिचे केस विंचरणे ही जबाबदारी माझ्याकडे होती. काही महिन्यानंतर मास्टर विनायक हे सहकाऱयांसह मुंबईला गेले. लतादीदीही गेल्या. आपल्याला मात्र त्यावेळी तात्काळ मुंबईला जाणे शक्मय झाले नाही. 1953 साली आपण मुंबईला गेलो. यानंतर पुन्हा लतादीदींशी गाठीभेटी सुरू झाल्या. समारंभ, घरगुती कार्यक्रम यातून कौटुंबिक स्नेह वाढला. मराठा तितुका मेळवावा या चित्रपटात मी साकारलेली जिजाबाईंची भूमिका लतादीदींना खूप आवडली. यातून त्यांनी मला त्यावेळी सोन्याचा नेकलेस भेट दिला. आपण ज्या चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी बहुतांशी चित्रपटांची गाणी लतादीदींनी गायिली.
माझ्या घरीच लतादीदींनी केले पुस्तक प्रकाशन…
माझी मुलगी कांचन काशिनाथ घाणेकर हिने रेशीमगाठी हे पुस्तक लिहिले होते. 1999 साली या पुस्तकाचे प्रकाशन लतादीदींच्या हस्ते करायचे होते. यादरम्यान आपल्या नातीचा अपघात झाला. अशावेळी आपण अपघातातून बरे झाल्यानंतरच लतादीदींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालेले आपल्याला पहायचे आहे, असा आग्रह नातीने धरला. दुसरीकडे प्रकाशकांनाही विलंब होत होता. अशावेळी आपण लतादीदींना संपर्क साधत आपली अडचण सांगितली. यानंतर दुसऱयाच मिनिटाला लतादीदींनी माझ्या घरी येत पुस्तक प्रकाशन करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार अतिशय बिझी शेडय़ुल असतानाही त्यांच्या उपस्थितीत माझ्या घरी पुस्तक प्रकाशन पार पडले.
हुन्नरगीतील गुरवनी जपली मंगेशकरांची भेट
हुन्नरगी (ता. निपाणी) येथील प्रख्यात तबलावादक दिवंगत रामचंद्र भाऊ गुरव यांचे मंगेशकर कुटुंबाशी स्नेहसंबंध होते. यातून त्यांना मिळालेली तबला जोडी आजही रामचंद्र यांचे पुत्र कल्लाप्पा गुरव यांनी सुरक्षित ठेवली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर कल्लाप्पा गुरव यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. गुरव म्हणाले, आपले वडील दिवंगत रामचंद्र गुरव हे त्याकाळी दीनानाथ मंगेशकर यांनी सुरू केलेल्या नाटक कंपनीत तबलावादक म्हणून कार्यरत होते. या कंपनीतर्फे बडोदा, पुणे, मुंबई यासह अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग झाले. सुमारे 17 वर्षे वडील रामचंद्र हे मंगेशकर यांच्यासोबत तबलावादक म्हणून राहिले. कालांतराने कंपनी बंद झाल्यानंतर पगार थकल्याने दीनानाथ मंगेशकर यांनी असलेली तबला जोडी वडिलांना दिली. त्यांनी ती जपून ठेवली. 1989 साली वडिलांचे निधन झाले. यानंतरही ही तबला जोडी आपण जपून ठेवली आहे. 1979 साली वडिलांसोबत आपण मुंबईला लता मंगेशकर यांची भेट घेतली. यावेळी सुमारे तासभर गप्पा रंगल्या होत्या.