ऑनलाईन टीम / अमरावती :
बहुचर्चित मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती पोलिसांनी रात्री उशिरा नागपूरात कारवाई केली.
दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होते. अखेर रात्री उशिरा श्रीनिवास रेड्डी यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
एम.एस. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस. रेड्डी यांचे अखेर निलंबन करण्यात आले होते .
रात्री उशिरा शहरातील एका हॉटेल जवळ ते दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची नागपुरात जुजबी नोंद केल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले.