शिवकुमार नंतर रेड्डी जाळय़ात : मृत्यूनंतर तरी न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरु
प्रतिनिधी / सातारा
उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱया आणि दीपाली चव्हाण या ‘लेडी सिंघम’च्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत अपर मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान, विनोद शिवकुमार याला अगोदरच बेडय़ा ठोकण्यात आल्या असून आता वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक झाल्याने मृत्यूनंतर तरी दीपाली चव्हाण यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे समोर येते आहे.
दीपाली चव्हाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हा अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होता. काल रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल आहे. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या मदतीने नागपुरात ही कारवाई केली आहे.
दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येपासून रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून केली जात आहे. भाजपाने नागपूर जिह्यात मोठय़ा प्रमाणात निदर्शने व आंदोलन करण्यात आले. तसेच, वन विभागातील आणि शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱयांच्या आशीर्वादाने रेड्डी यांना अभय मिळते आहे असे आरोप देखील त्यांच्याकडून केले जात होते.
दीपाली चव्हाण यांची मेळघाटात 2014 पासून 2021 पर्यंत सात वर्षांची सेवा झाली होती. त्यामुळे मेळघाटाबाहेर त्यांना बदली हवी होती. हरिसाल येथून परतवाडा किंवा अमरावती येथे बदली मिळावी यासाठी दीपाली चव्हाण यांचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱयांकडे अर्ज केला होता. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने त्या निराश झाल्या होत्या. त्यातच बदलीसाठी त्रयस्थांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. त्यात महाविकास आघाडीतील एका महत्त्वाच्या नेत्याने त्यांच्याकडून पैसे घेतले. हे पैसे घेऊनही त्यांची बदली केली गेली नाही. त्यामुळे त्या खचून गेल्या होत्या. त्यांना नैराश्य आले होते. हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, पती राजेश मोहिते आणि आई शांताबाई चव्हाण यांच्या नावे तीन स्वतंत्र पत्र लिहिले होते. या तिन्ही पत्रात उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या जाचामुळे आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर शिवकुमारला अटक झाली आणि रेड्डीलाही अटक झाल्याने न्याय मिळण्याची प्रक्रिया गतीमान झालीय. दीपाली यांच्या आई साताऱयात रहात असून या प्रकरणाकडे सातारकरांचे लक्ष आहे.