फक्त नववी ते बारावीचे वर्ग : कोरोनाचे सावट कायम : जिल्हय़ात 256 शाळांचे 42 हजार 424 विद्यार्थी
आवश्यक सुविधा
थर्मामीटर
थर्मल गन
प्लस ऑक्सिमीटर
जंतुनाशक साबण
विद्यार्थी संख्या
नववी 10 हजार 714
दहावी 11 हजार 392
अकरावी 9 हजार 729
बारावी 10 हजार 599
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’ संसर्गामुळे बंद असलेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. कोविड नियमांचे पालन करून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येऊन शाळा सुरू करण्यास प्रशासन सज्ज झाले आहे. सिंधुदुर्गात 256 शाळांमधील 42 हजार 424 विद्यार्थ्यांसाठी तब्बल नऊ महिन्यानंतर शाळेचे दरवाजे खुले होणार आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी लेखी संमती आवश्यक असल्याने आणि कोविड टेस्टमध्ये काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तसेच काही शाळांमध्ये अजूनही निर्जंतुकीकरण केले नसल्याने प्रत्यक्षात शाळेत किती विद्यार्थी येतात, याकडे लक्ष लागले आहे
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार 23 पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्या सोमवारपासून सुरू होतीलच असे नाही. ज्या शाळांनी सर्व उपाययोजना केल्या आहेत, त्या सुरू होतील आणि उर्वरित टप्याटप्याने सुरू होतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. काही शिक्षकांचे कोविड अहवाल यायचे आहेत. तर काही शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. काही शाळांमध्ये निर्जंतुकीकरण झालेले नाही, अशा अनेक अडचणी आहेत. स्थानिक स्तरावर शैक्षणिक संस्थास्तरावर त्या सोडविल्या जाणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी टप्याटप्याने आठ-दहा दिवसांत सर्व शाळा सुरू होतील, असेही कडूस यांनी स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या सत्रातच मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्यानंतर मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा थोडा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सोमवारपासून माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे.
जिह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 256 शाळा असून 42 हजार 424 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये नववीतील 10 हजार 714 विद्यार्थी, दहावीतील 11 हजार 392 विद्यार्थी, अकरावीतील 9 हजार 729 विद्यार्थी, बारावीतील 10 हजार 599 विद्यार्थी शाळेमध्ये हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे.
अहवाल आलेले शिक्षकच येणार
माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी 256 शाळांमधील 1 हजार 892 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयाची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्या शिक्षकांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे, ते शिक्षक शाळेवर शिकवण्यासाठी येणार आहेत.
एका बाकावर एकच विद्यार्थी
शाळा सुरू करत असताना सर्व शाळा निर्जंतुकीकरण करून स्वच्छ करण्यात आल्या आहेत. तसेच हात धुण्याची सुविधा, थर्मामीटर, थर्मल गन, प्लस ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी व शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे, एका बाकावर एकच विद्यार्थी, चारपेक्षा अधिक विद्यार्थी एकत्र न येणे याची खबरदारी घेतली जाणार आहे. एक दिवस आड 50 टक्के विद्यार्थ्यांना बोलवले जाणार आहे. कोरोनाच्या सावटाखालीच नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. त्यासाठी जिह्यातील 256 शाळा सज्ज झाल्या असून 42 हजार 424 विद्यार्थ्यांसाठी नऊ महिन्यानंतर शाळांचे दरवाजे उघडणार आहेत.
शाळेत किती विद्यार्थी येणार याकडे लक्ष
कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. तरीही कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू होत आहेत आणि शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी पालकांना लेखी संमती आवश्यक केली आहे. त्यातच आता कोविड तपासणीत जिह्यातील काही शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. तर काही शिक्षकांचे अहवाल यायचे आहेत. तर काही शाळा कोविड रुग्णांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. त्या निर्जंतुकीकरण करून ताब्यात दिलेल्या नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे. त्यामुळे शाळेत किती विद्यार्थी येतात, याकडे लक्ष लागले आह.