प्रतिनिधी/ गुहागर
शहरातील समुद्रचौपाटीवरील छोटी-मोठी दुकाने एकाबाजुला करून चौपाटीवरील सौंदर्य टिकवण्यासाठी बंदर विभाग प्रयत्न करत आहे. यासाठी आपल्या वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव गेला आहे, तर मनमानी दुकाने थाटणाऱयांची चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बंदर अधिकारी संजय उगलमुगले यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
शहर समुद्रचौपाटीवरील निसर्गरम्य सुरूबनामध्ये छोटय़ा-मोठय़ा दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वीचे दुकानदार हळूहळू आजूबाजुच्या जागेमध्ये आपला विस्तार वाढवत आहेत. कोणाचीही परवानगी नाही. मनाला वाटेल तसे कोणीही दुकाने थाटू लागल्याने समुद्रचौपाटीवरील सुरूबनाचे सौंदर्य नष्ट होत चालले आहे. अशावेळी बंदर विभागाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सदर जागा बंदर विभागाच्या ताब्यात असल्याने महसूल व गुहागर नगरपंचायत याकडे लक्ष देत नाही.
या पार्श्वभूमीवर येथील नियोजनाबाबत जिल्हा बंदर अधिकारी उगलमुगले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, समुद्रचौपाटीवरील 17 व्यावसायिकांनी आपल्याकडे नियोजित जागा मिळण्याबाबत मागणी केली आहे. गुहागर समुद्रचौपाटीवरील सौंदर्य टिकून रहावे यासाठी सुरूबनामध्येचे दुकाने उभी करण्याचे नियोजन व तशाप्रकारचा प्रस्ताव आपल्या वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे, परंतु या प्रस्तावाला कोरोना कालावधीचा अडसर आला आहे. कोरोना काळात कोणतीच कामे झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जर कोणी मनाला येईल तसे बांधकामे व दुकाने उभारत असतील तर त्यांची पोलीस निरीक्षकांकडून चौकशी करण्यात येत आहे. चौपाटीवरील सुरूबनाची लागवड वनविभागाने केली आहे. तेथील कोसळलेले सुरूबन लिलावासाठीची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच लिलाव प्रक्रिया केली जाईल. तसेच स्थानिकांनाच रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असून यासाठी नियोजनात्मक दुकानांची बांधणी त्यांच्याकडूनच केली जाणार असल्याचे सांगितले. मात्र सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयातून मंजूर होऊन आला नसल्याचे सांगितले. मात्र सध्याच्या परिस्थितीत चौपाटीवरील सुरू असलेल्या मनमानीपणावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.