भारतीय संघाच्या पाठीशी दुखापतीचा ससेमिरा कायम, मयांक अगरवालला सराव सत्रादरम्यान दुखापत
वृत्तसंस्था/ सिडनी
आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह दुखापतीमुळे ब्रिस्बेन येथील चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला असून यामुळे भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला. ब्रिस्बेनमध्ये अंतिम एकादशमधील स्थान जवळपास निश्चित असलेल्या मयांक अगरवालला चेंडू हातावर आदळला असून त्याला हेअरलाईन प्रॅक्चर असू शकते. इतके कमी की काय म्हणून रविचंद्रन अश्विनची पाठदुखीही बळावली आहे.
अश्विनने यापूर्वी तिसऱया कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसात तब्बल तीन तास अगदी झुंजार खेळ साकारला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच जिरवली. पण, आता तो पाठदुखीमुळे उपलब्ध असेल का, याबद्दल साशंकता निर्माण झाली असून यामुळे भारताकडील पर्याय आणखी कमी होणार आहे.
बुमराहला अनिर्णीत राहिलेल्या सिडनीतील तिसऱया कसोटी सामन्यादरम्यान पोटरीची दुखापत जाणवली होती. बुमराहच्या चाचणी अहवालात दोष आढळून आला आणि ही दुखापत चिघळू नये, या दृष्टिकोनातून भारतीय संघव्यवस्थापनाने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर शिक्कामोर्तब केले गेले.
‘जसप्रितला सिडनीत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. तो ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही. पण, इंग्लंडविरुद्ध उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे’, असे असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. बुमराहची दुखापत फारशी गंभीर नाही, हा व्यवस्थापनासाठी दिलासा आहे. मात्र, ते आणखी चिघळू नये, यासाठी त्याला विश्रांती देणे पसंत केले गेले.
‘जर तो 50 टक्के तंदुरुस्त असतानाही आम्ही त्याला खेळवले आणि शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याची दुखापत आणखी चिघळली तर इंग्लंडविरुद्ध मालिकेत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कोण खेळेल, हे निश्चित होण्यापूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका शेवटची असेल. त्यामुळे, बुमराह तंदुरुस्त असणे आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे’, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ सदस्याने यावेळी नमूद केले.
गोलंदाजीची धुरा सिराजकडे
अवघे 2 कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या मोहम्मद सिराजकडे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजीची मुख्य धुरा असेल, असे सध्याचे संकेत आहेत. सिराजला नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, टी. नटराजन यांची साथ लाभेल. बुमराह खेळू शकत नसल्याने टी. नटराजनला पदार्पणाची संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जाते.
भारताला मध्यफळीची चिंता
केएल राहुल दुखापतीनंतर मायदेशी परतल्याने व हनुमा विहारीला दुखापत झाल्याने मधल्या फळीत फारसे राखीव फलंदाज नाहीत, ही भारताची मुख्य चिंता आहे. पृथ्वी शॉ व मयांक अगरवालच्या रुपाने जे अन्य दोन फलंदाज उपलब्ध आहेत, ते दोघेही खराब फॉर्ममध्ये आहेत. महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये आता 4 गोलंदाज, 6 फलंदाज व यष्टीरक्षक ऋषभ पंत अशा रणनीतीला पसंती देणार का, हे पहावे लागेल. अगरवाल खेळू शकत असेल तर पृथ्वी शॉ तिसऱया स्थानी उतरु शकेल व त्यानंतर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व व अगरवाल सहाव्या स्थानी उतरु शकेल.
भारताने 5 गोलंदाज खेळवले तर त्यातील मध्यमगती गोलंदाजांचा एकत्रित अनुभव केवळ 3 सामने व 10 चेंडू इतकाच असेल. आजवर सिराजने 2 तर सैनीने 1 सामना खेळला. शार्दुलने पदार्पणाच्या कसोटीत केवळ 10 चेंडू टाकले तर नटराजन अद्याप पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
स्टीव्ह स्मिथने ‘तो’ ठपका फेटाळला
तिसऱया कसोटी सामन्यात ऋषभ पंत फलंदाजी करत असताना क्रीझवरील त्याचा स्टान्स घेण्याचा मार्क पुसून काढल्याचा ठपका स्टीव्ह स्मिथवर आला. पण, स्मिथने सदर आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. तिसऱया सामन्यादरम्यान स्टम्प कॅमेऱयाच्या व्हीडिओ फुटेजमध्ये स्मिथ क्रीझवर बुटाने पाय ओढत असल्याचे निदर्शनास आले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही माजी खेळाडूंनी स्मिथने खिलाडूवृत्तीला कलंक लावल्याचा ठपका ठेवला. स्मिथने सदर आरोप धक्कादायक व निराशाजनक असल्याचा दावा केला आणि आपण असे सेंटरमार्क नेहमी करत असतो, असे म्हटले.
ब्रिस्बेनमधील हॉटेलबद्दल टीम इंडियाची नाराजी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला. मात्र, संघ उतरलेल्या हॉटेलमध्ये अगदी रुम सर्व्हिस, जिम देखील उपलब्ध नसल्याने टीम इंडियाने यावर नाराजी नोंदवली. जलतरण तलाव उपलब्ध नसल्याने यात आणखी भर पडली. हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता दोन्ही संघांना एकच नियम असल्याचे त्यांना सांगण्यात आले. भारतीय संघ क्वीन्सलँडच्या या राजधानीत दि. 15 पासून चौथी व शेवटची कसोटी खेळणार आहे.
अश्विनला स्लेजिंगप्रकरणी टीम पेनची क्षमायाचना
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने तिसऱया कसोटी सामन्यादरम्यान अश्विनला उद्देशून स्लेजिंग करणे चुकीचे होते, अशी जाहीर कबुली आभासी पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक, टीम पेनने येथे हजर राहणे अपेक्षित नव्हते. पण, त्याने स्वतःहून हजर रहात आपल्याला काही बाबींची कबुली द्यायची असल्याचे नमूद केले. ‘मी मुर्खासारखो वागलो, असे मी सामना पूर्ण झाल्यानंतर थेट अश्विनला देखील सांगितले. अश्विनशी स्लेजिंग करण्याऐवजी मी माझ्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित ठेवले असते तर मला चुका टाळता येणे शक्य झाले असते’, असे टीम पेन येथे म्हणाला. अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर काही वेळेतच त्याने हनुमा विहारीचा झेल सोडला होता. या लढतीत त्याने एकूण 3 फलंदाजांना जीवदाने दिली. अश्विनला स्लेजिंग केल्यानंतर माझ्यावर दडपण आले आणि त्यातूनच माझ्याकडून चुका झाल्या, असे तो येथे जाहीरपणे म्हणाला.