प्रतिनिधी / बेळगाव
अभियांत्रिकी परिक्षेसाठी तिची तयारी सुरू होती, परिक्षा अवघ्या आठ दिवसांवर असताना अचानक झालेला आईचा मृत्यू, एकीकडे आई गेल्याचे दु:ख आणि दुसरीकडे आयुष्य घडविणारी परीक्षा, आईचे स्वप्न होते मुलगी शिकून मोठी व्हावी, त्यामुळे दु:खातूनही मार्ग काढत तिने यशाचे शिखर गाठले, 4 विषयांमध्ये पैकीच्यापैकी तर दोन विषयांमध्ये 99 गुण मिळवले, त्यामुळे तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोकाक तालुक्मयातील अंकलगी येथील भारती व्यंकटगिरी कुलकर्णी असे त्या कर्तुत्ववान विद्यार्थिनीचे नाव आहे. जैन कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनिअरींग विभागात 6 व्या सेमीस्टरला ती शिकत आहे. शेतकरी कुटुंबातील भारती अभ्यासात हुशार आहे. तीने परीक्षेची तयारी जोरदार सुरू ठेवली होती. परंतु याच दरम्यान तिच्या आईची तब्येत खालावू लागली. परीक्षा आठ दिवसांवर असतानाच तिच्या आईचा 30 मार्चला मृत्यू झाला. तिच्यावर व कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
परीक्षा तोंडावर असताना आईचा झालेला मृत्यू यामुळे भारतीलाही मानसिक ताण सहन होत नव्हता. अशा परिस्थितीतही आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरविले. आठ दिवसांनी ऑनलाईन परीक्षा दिली. दु:खा बाजूला सारून परीश्रम घेवून ती परीक्षेला सामोरी गेली. आता तिचा निकाल आला असून तिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
तिने मिळविलेले हे यश नक्कीच कौतुकास पात्र आहे. त्यामुळे बेळगावमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जावून तिचा सत्कार केला. माजी महापौर शिवाजी सुंठकर, पुंडलिक पावशे, महेश रेडेकर, किसन सुंठकर, भारतीचे वडील व्यंकटगिरी यावेळी उपस्थित होते.