महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-
चित्रलेखेने रातोरात कुणालाही खबर पडू न देता अनिरुद्धाला द्वारकेतून पळवून शोणितपूराला नेले. इकडे पहाटे सेवक पाहतात तो अनिरुद्ध त्यांना कुठे दिसेना. त्यांनी तातडीने ही वार्ता श्रीकृष्ण, बलरामदादा व अनिरुद्धाचा पिता प्रद्युम्न यांच्या कानावर घातली. या तिघांनीही आपापल्या पत्नीला ही वार्ता सांगितली व सुनेला याविषयी काही माहिती आहे काय हे पहायला सांगितले. त्याप्रमाणे बलरामाची पत्नी रेवती, कृष्णाची पत्नी रुक्मिणी व प्रद्युम्नाची पत्नी रति ह्या तिघीजणी अनिरुद्धची पत्नी रोचना हिच्याकडे आल्या व त्यांनी अनिरुद्ध कुठे आहे याबद्दल चौकशी केली. रोचना म्हणाली-काल ते दिवसभर व्रतस्थ असल्याने माझ्या संगतीत नव्हते. ते दिवसभर भजन पूजनात रमलेले होते. रात्री उशिरापर्यंत भजन चालले. त्यानंतर ते आपल्याच महालात एकटेच निद्रा करायला गेले. ते व्रतस्थ असल्याने मी त्यांच्यासोबत त्यांच्या शयनगृहात गेले नाही. मी माझ्या महालातच होते. ते कुठे गेले असतील तर त्याबद्दल त्यांनी मला काहीच सांगितलेले नाही. अनिरुद्ध असा अचानक कुणालाही न सांगता कुठे गेला? त्याला कुणी पळवून तर नेले नाही? सर्वजण काळजी करू लागले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. बालपणीच प्रद्युम्नाला त्याच्या मातेच्या कुशीतून शंबरासुराने असेच पळवून नेले होते. त्याचा वध करण्याचाही प्रयत्न त्याने केला होता. केवळ दैव अनुकूल असल्याने त्याचे प्राण वाचले होते. हे सारे द्वारकावासियांच्या चांगलेच स्मरणात होते. प्रद्युम्नानंतर त्याचा पुत्र अनिरुद्ध याच्यावरही असेच संकट कोसळले नाही ना? सर्व द्वारकावासी चिंता करू लागले. अनिरुद्धाची माता रति व पत्नी रोचना यांच्या शोकाला तर पारावार राहिला नाही. रोचना आक्रंदन करून रडू लागली. ही रोचना आता आपल्या पतिशिवाय कशी आयुष्य कंठणार? सर्व स्त्रिया विलाप करू लागल्या. बलरामदादा, प्रद्युम्न, रेवती, रुक्मिणी एवढेच काय, प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या डोळय़ात पाणी आले. अशावेळी उद्धव व अप्रुर यांनी सर्वांना धीर दिला. राजा उग्रसेनाने देशोदेशी, वनोपवने धुंडाळायला सैनिक व दूत पाठवले. ब्राह्मणांकरवी विविध अनु÷ाने करवली. अनिरुद्धाची आजी रुक्मिणी, आई रति व पत्नी रोचना यांचे सांत्वन कोण कसे करणार? सर्व यादव दु:खाने वेडे झाले.
एक म्हणती अमरभुवनीं । अनिरुद्ध नेला निर्जरगणीं । पार्याताची मानूनि हानि । वज्रपाणि क्षोभला । ऐसे अनेक तर्क करिती । दु:खें सदैव आक्रंदती ।यावद्वर्षाकाळसमाप्ती । क्रमिल्या राती सशोक । चाऱही मास वर्षाकाळीं । बंधुवर्गांची मंडळी । अनिरुद्धाच्या शोकानळीं । दु:खें समूळीं आहाळतसे । जेव्हां बाणें नागपाशीं । अनिरुद्ध बांधूनि रणभूमीसी । पाडिला त्याचे अवस्थेसी । देखूनि देवर्षि कळवळिला। सवेग पातला द्वारकापुरा । वार्ता कथिली द्वारकेश्वरा । अनिरुद्ध नेला बाणनगरा । उषा सुन्दरा पर्णावया । उषेसी भवानीचा वर । स्वप्नीं तुजसीं रमेल नर । तोचि होईल तव भर्तार । केला निर्धार वरदानें ।
ऍड. देवदत्त परुळेकर