गोकुळचे सर्वाधिक दहा कोटींचे नुकसान
प्रतिनिधी / कोल्हापूर
ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. रस्ते बंद झाल्यामुळे दूध संकलन झाले नाही. तर महामार्ग बंद झाल्याने मुंबई, पुणेसह राज्यातील अन्य भागात दुधाची विक्री हेऊ शकली नाही. त्यामुळे चार दिवसांत या व्यवसायाला 20 कोटींचा फटका बसला आहे. यात सर्वाधिक गोकुळ दूध संघाला 10 कोटी 44 लाख तर संलग्न शेतकर्यांना 6 कोटी 16 लाख रुपये नुकसान सोसावे लागले आहे. महापुराची मदत जाहीर करताना या व्यवसायाचाही विचार करावा, अशी मागणी पुढे आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर पाणी आल्यामुळे रस्ते बंद झाले. परिणामी दूध संकलन करता आले नाही. 21 ते 26 जुलै पर्यंत पूर्ण क्षमतेने संकलन झाले नाही. त्यामुळे शेतकर्यांकडे दूध शिल्लक राहिले. त्यामुळे कमी भावाने गावातच कमी दराने दूध विक्री करावी लागली. या काळात एका गोकुळचे 16 लाख 43 हजार लिटर दूध संकलन झाले नाही. तर महामार्ग बंदमुळे मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई पुण्यातील दूधविक्री ठप्प झाली. त्यामुळे 20 लाख 88 हजार लिटर दूध विक्री झालेली नाही. आता मंगळवारी शिरोळ, करवीर तालुक्यातील काही मार्ग वगळता दूध संकलनासह विक्री हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
22 ते 26 जुलै संकलन घट म्हैस दूध - 7 लाख 53 हजार लिटर गाय दूध - 8 लाख 89 हजार लिटर शेतकर्यांचे एकुण नुकसान - 6 कोटी 16 लाख मुंबई, पुणे विक्री घट - 20 लाख 88 हजार लिटर विक्री न झाल्याने नुकसान - 10 कोटी 44 लाख
नुकसान भरपाईसाठी विचार व्हावा
महापुराचा सर्वाधिक फटका दुग्ध व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्याचे अर्थकारण या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचे निकष ठरवताना दुग्ध व्यवसायाचाही विचार झाला पाहिजे.
– विश्वास पाटील, चेअरमन कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)