भारताचा पाकिस्तानला सुचनावजा आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवी दिल्ली येथील दुतावासातील कर्मचारीवर्ग कमी करण्याचा सूचनावजा आदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारतीय विदेश मंत्रालयाने पाकिस्तानचे पदाधिकारी सैयद हैदर शाह यांना पाचारण करत पाकिस्तानी दुतावासातील कर्मचारीवर्ग 7 दिवसांमध्ये 50 टक्क्यांनी कमी करण्यास सांगितले आहे. दूतावासातील कर्मचाऱयांच्या हालचालींबद्दल विदेश मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर भारताने इस्लामाबाद येथील स्वतःच्या दूतावासातील कर्मचारीवर्ग कमी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी हेरगिरीत सामील असून दहशतवादी संघटनांसोबत त्यांचे संगनमत असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 21 मे रोजी हेरगिरीच्या आरोपाखाली भारताने दोन पाकिस्तानी अधिकाऱयांना देश सोडण्याचा आदेश दिला होता. याचबरोबर भारतीय अधिकाऱयांचा पाकिस्तानात होत असलेल्या छळाबद्दल विदेश मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानात दोन भारतीय अधिकाऱयांना ‘हिट अँड रन’च्या खोटय़ा आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. भारताने दबाव टाकल्याने या अधिकाऱयांची 10 तासांनी मुक्तता करण्यात आली होती. मुत्सद्यांना प्राप्त होणाऱया विशेषाधिकारांचे पाकिस्तानात उल्लंघन होत आहे. भारतीय अधिकाऱयांना त्यांचे राजनयिक कर्तव्य पूर्ण करू देण्यास पाकिस्तान खोडा घालत आहे. भारतीय मुत्सद्दी 22 जून रोजी देशात परतले आहेत. पाकिस्तानात झालेल्या छळाची माहिती त्यांनी दिली आहे. पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे पालन होत नसल्याने भारताने दुतावासातील कर्मचाऱयांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचनुसार भारतातील पाकिस्तानी दूतावासाला त्यांचा कर्मचारीवर्ग कमी करण्यास सांगण्यात आले असून याकरता 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.