प्रतिनिधी/ मडगाव
वास्को-डा-गामाला ते कॅसल रॉकच्यापर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला सध्या विरोध होत असला तरी या मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास प्रवासी रेलगाडय़ांची संख्या वाढण्याबरोबरच गोव्यातील रेल्वे स्थानकाचा देखील विकास होणार असल्याचा दावा दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आला आहे. सध्याचा एकेरी मार्ग हा जवळपास शंभर वर्षापूर्वीचा आहे.
रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास गोव्याचे राज्य दक्षिणेकडील राज्यांना अधिक प्रभावीपणे जोडले जाणार आहे. त्याच बरोबर दुप्पट पायाभूत साधन सुविधा ही गोव्याला उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटक राज्यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे.
सध्या या रेल्वे मार्गावरून केवळ 6 म्हणजेच 3 जोडय़ा एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाडय़ा दररोज धावतात. रेल्वेचा एकेरी मार्ग असल्याने प्रवासी रेल्वेगाडय़ांची संख्या वाढविता येत नाही. जर वास्को-द-गामा ते कॅसलरॉकपर्यंतच्या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले तर नक्कीच प्रवासी रेल्वेगाडय़ांत वाढ होणार असल्याची हमी रेल्वे अधिकारी देतात.
सध्याचा एकेरी मार्ग त्यात कॅसलरॉक ते कुळेपर्यंतचा रस्ता हा घाट मार्ग असून त्यामुळे देखील समस्या निर्माण होत आहे. पावसाळय़ात दरडी कोसळल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असते. त्यामुळे दुपदरीकरण हाच यावर पर्याय असल्याचा दावा रेल्वे अधिकारी करीत आहेत.
प्रवासी रेल्वेगाडय़ांची संख्या वाढली तर नक्कीच त्याचा लाभ गोव्यातील पर्यटन व्यवसायाला होणार आहे. पर्यटनांसाठी आजही असंख्य पर्यटक हे गोव्यालाच अधिक पसंती देतात. पण, योग्य वाहतूक व्यवस्था नसल्याने, त्यांना गोव्यात येणे कठीण होत असते.
वास्को-द-गामा ते कॅसलरॉकपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाल्यास वास्को-द-गामा, सावर्डे-कुडचडे, कुळे या रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचावला जाणार आहे. तसेच मडगावहून या भागांना भेट देणाऱयांची संख्या देखील वाढणार आहे. सध्या या रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म हे केवळ 18 ते 20 कोच (डबे) हाताळू शकते. जर 24 कोच लांबीच्या मेल – एक्सप्रेस गाडय़ा आल्या तर स्थानकाचे प्लॅटफॉर्म अपुरे पडणार आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मचा ही विस्तार करावा लागणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
या रेल्वेमार्गावर दाबोळी, सांकवाळ, कांसावली, माजोर्डा, सावर्डे, काले व कुळे येथे स्थानके आहेत. परंतु, या स्थानकांवरून पुरेसे प्रवासी उपलब्ध होत नाही. जर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाले तर या स्थानकाचा विकास होईल. त्याच बरोबर प्रवासी देखील उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.
सध्या लेव्हल क्रॉसिंगसाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तो टाळण्याठी कामराळ-कुडचडे येथे 3 नवीन उपमार्ग बांधण्याचे नियोजन केले गेले आहे. तसेच सावर्डे, चांदोर आणि कुळे येथे नवीन ओव्हर ब्रिज तसेच काले व सांव जुझे दी आरियल येथे दोन अरूंद पुलांचे रूंदीकरण केले जाणार आहे.
गोव्यात अरबी समुद्रात रणनीतिकदृष्टय़ा नेव्हल कमांड आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत थोडय़ा सूचनेत या ठिकाणी सैन्य आणि साहित्य रेल्वे मार्ग हलविणे शक्य आहे. त्यामुळे संरक्षण दृष्टीकोनातून देखील रेल्वे नेटवर्कला महत्व आहे. तसेच गोव्यातील मुरगांव पोर्ट हा प्रमुख असून तो आसपासच्या प्रदेशात बंदराना जोडला जाणार आहे. त्यामुळे गोव्याला आर्थिक दृष्टय़ाही तो महत्वाचा मानला जात आहे. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करतानाच विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वगाडय़ांची गती वाढणार आहे. तसेच पर्यावरणावर देखील परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.