सकाळचं जेवण चांगलं झालं की दुपारी (टीव्ही न बघता) छान झोप लागते. कधी कधी अशा झोपेत चांगली स्वप्नं देखील पडतात. काल काय झालं, की जेवायला बसलो तेव्हा टीव्हीवर बातम्या पहात होतो. जेवण जड झालेलं आणि त्यात समोर बातम्या. चटकन झोप लागली. एकामागून एक सुंदर स्वप्नं दिसली.
स्वप्नात दिसलं की मी सकाळी पहिला चहा घेताना टीव्ही लावला आहे आणि वृत्तनिवेदिका आरडाओरडा न करता, न किंचाळता शांत आवाजात बातम्या सांगते आहे. सगळय़ा बातम्या खरोखरच दखल घ्याव्या अशा आहेत. त्या ऐकताना एखादं दर्जेदार वृत्तपत्र वाचत असल्याचा भास झाला. बातम्या संपल्या आणि विविध वाहिन्यांवरील मालिकांची यादी पडद्यावर आली. ती पाहूनच मी थक्क झालो.
अरविंद गोखले, जयवंत दळवी, दिलीप प्रभावळकर, पुल, रत्नाकर मतकरी, रमेश मंत्री, शन्ना नवरे, शरच्चंद्र चिरमुले, शांताराम वगैरेंच्या कथांवर आधारित मालिका एकेका वाहिनीवर सुरू होणार आहेत. हिंदीतल्या ‘आहट’च्या धर्तीवर नारायण धारप यांच्या कथांवर आधारित भयकथांची मालिका रात्री उशिरा दिसेल. जयंत नारळीकरांच्या ‘प्रेषित’वर आधारित नवी मालिका येईल. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे यांच्या कथांवर आधारित विज्ञान कथांच्या मालिका सुरू होतील. दर रविवारी सकाळी विज्ञान विषयावर खास चर्चासत्र सुरू होणार आहे. यंदा मिळालेल्या नोबेल पुरस्कारांवर पहिले दोन महिने दर्जेदार चर्चकांना बोलावून चर्चा होतील. नोबेल विजेत्या संशोधकांमध्ये आपल्या देशातील नावे का येत नाहीत, आपण या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काय करता येईल यावर देखील नंतर चर्चा होईल. चर्चा चालू असताना सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य असेल. चर्चक एकमेकांच्या अंगावर वचावचा ओरडणार नाहीत. एकमेकांना बोलू देतील. विविध वाहिन्यांवर जोरजोरात मुठी आवळून किंचाळणाऱया आणि समोरच्याला बोलू न देणाऱया सर्व अँकर मंडळीची टीव्हीवरून कायमची हकालपट्टी झाली आहे. एका वाहिनीने टीआरपी घोटाळय़ावर चर्चा करण्यासाठी विविध वाहिन्यांवरील बडतर्फ कर्मचारी, वाहिनीप्रमुख, अँकर्स वगैरेंना बोलावण्याचा घाट घातला आहे. अर्थातच यातले काही चर्चक कदाचित गजाआड असतील. तिथून ते माईकसमोर तोंड धरून कसे किंचाळतील याचे चित्र दिसले आणि खदखदा हसत मी झोपेतून जागा झालो. मघाशी झोपताना टीव्ही बंद करायचा राहिला होता आणि खरोखरच एक अँकर समोरच्या पडद्यावर हातवारे करून किंचाळत होता!