कोरोना गेला नाही. पण मायबाप शासनाने (बहुधा कंटाळून) लॉकडाऊन नावाचे त्रासदायक प्रकरण शिथिल केले आहे. रस्त्यावरून लोक येता-जाताना दिसू लागले. बरेच दिवस आम्ही अगदी गरज पडल्याखेरीज घराबाहेर पडलो नव्हतो. सकाळी बागेत फिरणे थांबले होते. त्यानंतर उडप्याकडची न्याहारी थांबली होती. घरचं अन्न अंगी लागलं आणि थोडीशी बचत झाली होती.
पण आता दोन तीन दिवसातून एकदा भीत भीत बाहेर पडतो. खरेदी करतो.
भाजी संपली म्हणून म्हणून थोडेसे पैसे आणि पिशवी घेऊन बाजारहाट करण्यासाठी निघालो होतो. तेच रस्ते, तीच–भीत भीत अर्धवट उघडलेली–दुकाने… पण आजकाल काहीतरी बदलल्यासारखे वाटते. आकाश आणि सूर्य वगळता सगळे परके वाटतात. नेहमीचे काही परिचित चेहरे असतात. पण कितीतरी अनोळखी चेहरे रस्त्यावर येऊन बसलेले दिसतात.
टीव्हीवरच्या कर्कश्श वार्ताहरांना कधीच न दिसणाऱया बातम्या इथे दिसतात. सोशल मीडियावर अनेकांनी कळवळून सांगितले होते की अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. नोकऱया गेल्या आहेत. हाताला कामे नाहीत. त्याची इथे प्रचिती येते. नेहमीच्या चौकात एरव्ही इन मिन दहा-बारा भाजीवाले आणि इतर विपेते असतात. हल्ली इथे त्यांच्याखेरीज कितीतरी अनोळखी आबालवृद्ध, आयाबाया फूटपाथवर केळी, स्वस्त भाज्या, अंडी, कापडाच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, विकायला बसलेल्या असतात. एरव्ही हे लोक कुठेतरी नोकरी करीत असतील. आता नोकरी गेल्यामुळे रस्त्यावर आले आहेत. पण लोकांना व्यवसाय तरी काय सुचणार. नेहमीच्या विपेत्यांकडून खरेदी केल्यावर मी खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. शंभर रुपये शिल्लक होते. एका आजीकडून दहा रुपयांना कापडी पिशवी घेतली. मग ओळीने दिसतील त्यांच्याकडून दिसेल त्या वस्तू घेतल्या. कोबी, लिंबू, केळी, प्लास्टिकची गाळणी, चमचे… अगदी काहीही. नव्वद रुपये संपायला किती वेळ लागणार. पाच मिनिटात संपले. वाटेत पोस्ट ऑफिसची इमारत दिसली. तिच्या पायरीवर पिशवी ठेवून दिली. कोणालाही ती सापडेल. तो घेऊन जाईल. कृतार्थ भावनेने घरी आलो. मनात एकच विचार होता. देवाने मला जरा अधिक श्रीमंत करायला हवे होते. आज त्या रांगेतल्या सगळय़ांकडच्या सगळय़ा वस्तू विकत घेता आल्या असत्या तर ते सगळे लगेच घरी गेले असते आणि त्यांनी आजचा दिवस तरी मनापासून छान जेवण केले असते.