प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिकेच्या दुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पातून दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी प्रकल्पासमोरच्या ओहोळातून सरळ आगोंद नदीत सोडण्यात येत असून या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आगोंद मार्गावरून येणाऱया आणि जाणाऱया लोकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. या दूषित पाण्यामुळे आगोंद नदीचे पाणी खराब होत असल्याच्या तक्रारी वाढायला लागल्या आहेत.
कसलीच भिड न ठेवता मागच्या कित्येक वर्षांपासून हे बेकायदेशीर काम चालू असल्याचा दावा करून पर्यावरणप्रेमींनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तर एकेकाळी दुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पात सुधारणा करण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या गोंयकार या बिगरसरकारी यंत्रणेने दुर्गंधीयुक्त पाणी नदीत सोडण्याच्या प्रकाराला आक्षेप घेतला आहे.
तिन्ही बाजूंनी डोंगर असलेल्या जागी हा प्रकल्प असून पावसाळय़ात तिन्ही बाजूंनी डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी या ठिकाणी साचत असते. संपूर्ण पालिका क्षेत्रातील ओला आणि सुका कचरा या ठिकाणी गोळा करण्यात येत असतो. कचरा प्रक्रियेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळय़ात हीच परिस्थिती उद्भवत असते. यंदा सुक्या कचऱयावर प्लास्टिकचे आवरण घालण्यात आलेले आहे. तरी देखील या भागात पाऊस अधिक पडत असतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असते. या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सर्वाधिक परिणाम या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱया नागरिकांवर जसा होत असतो त्याचप्रमाणे आगोंद नदीचे पाणी त्यामुळे प्रदूषित होत असते. हेच पाणी शेवटी आगोंद समुद्राला मिळत असल्याची माहिती आगोंदचे माजी सरपंच प्रमोद फळदेसाई, पंच आबेल बोर्जिस यांनी दिली. काणकोण पालिका मागच्या जवळजवळ 15 वर्षांपासून दुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे तुणतुणे वाजवत आहे. या प्रकाराची माहिती यापूर्वी देखील उपसभापती इजिदोर फर्नांडिस आणि सामाजिक आरोग्य केंद्राला देण्यात आलेली आहे. मात्र आतापर्यंत योग्य ती कारवाई झालेली नाही, असाच सूर या भागातील नागरिकांकडून व्यक्त होताना ऐकायला मिळत आहे.