राज्याच्या किनारपट्टी जिल्हय़ांत समुद्री जीव बचाव केंद्र होणार स्थापन
सिंधुदुर्गात तोंडवळीची निवड
मॅनग्रोव सेल, मॅनग्रोव फाऊंडेशनचा उपक्रम
देवबाग / संदीप बोडवे:
सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच्या सर्वच किनारी जिल्हय़ांमध्ये स्वतंत्र सागरी जीव बचाव केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॅनग्रोव्ह सेल आणि मॅनग्रोव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या बचाव केंद्रांमध्ये जखमी दुर्मिळ सागरी प्रजातींवर तात्काळ उपचार करता येणे शक्य होणार आहे. किनारपट्टीवर बऱयाचवेळा व्हेलशार्क सारखे सागरी परिसंस्थेतील महत्वपूर्ण जीव मृतावस्थेत आढळतात. या जीवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा लावता येणेही आता शक्य होणार आहे.
महाराष्ट्राच्या मॅनग्रोव्ह सेल आणि मॅनग्रोव्ह फाऊंडेशनकडून किनारी जिल्हय़ात उभारण्यात येणाऱया सागरी जीव बचाव केंद्रांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पावसाळ्य़ात अनेक दुर्मिळ सागरी जीव जखमी किंवा मृतावस्थेत किनाऱयांवर आढळून येतात. याचा विचार करता, पुढील पावसाळ्य़ापूर्वी ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गात तोंडवळीची निवड
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे दोन नवीन सागरी जीव बचाव केंद्रे प्रस्तावित केली गेली आहेत. सिंधुदुर्गात तोंडवळी किनाऱयाची यासाठी निवड करण्यात आली आहे. अलिबाग व डहाणू येथील विद्यमान केंद्रांच्या उन्नत्तीसाठी स्वतंत्र निधी खर्च केला जाणार आहे. 65.5 लाख रुपयांच्या निधीची यासाठी तरतुद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गला विशेष लाभ – तिवारी
प्रकल्प प्रमुख आणि मुख्य वनसंरक्षक (मॅनग्रोव्ह सेल) वीरेंद्र तिवारी म्हणाले, आमच्या प्रकल्पांची पूर्तता आगामी पावसाळ्य़ापूर्वी म्हणजेच मे महिन्यापर्यंत होणे अपेक्षित आहे. आम्ही प्रत्येक केंद्राच्या पायाभूत सुविधांवर लक्ष देत आहोत. चांगल्या प्रकारची वैद्यकीय उपकरणे, प्रशस्त टाक्या आणि बांधकाम या बाबत तज्ञांशी सल्लामसलत करीत आहोत.
संकटग्रस्त प्रजातींना संरक्षण मिळेल – कर्वे
मॅनग्रोव्ह फाऊंडेशनचे सागरी जीव शास्त्रज्ञ हर्षल कर्वे म्हणाले, असे आढळून आले आहे, की पावसाळ्य़ात अनेक जखमी सागरी कासव आणि सागरी सस्तन प्राणी विविध कारणांनी अडकले आहेत. किनारी जिल्हानिहाय सागरी प्राणी बचाव केंद्रे विकसित केल्यास निश्चितपणे प्रथमोपचार आणि वेळेवर उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल आणि राज्यभरातील अनेक केंद्रांवरील दबाव कमी होईल. जखमी प्रजातींकडून उपचारादरम्यान जमा केलेली माहिती व त्याची कारणे समजून घेण्यासाठी त्यांचे विश्लेषण केले जाईल, जे या संकटात सापडलेल्या प्रजातींचे संवर्धन करण्यास मदत करेल.
पर्यावरणप्रेमींच्या कार्याला हातभार लागणार!
वायंगणी येथील कासव मित्र सुहास तोरसकर म्हणाले, जिल्हय़ात जखमी सागरी प्रजातींच्या उपचारासाठी किंवा उपचारापश्चात त्यांच्या देखभालीसाठी वनविभागाकडे कोणतीही व्यवस्था नव्हती. सिंधुदुर्गात सागरी जीव बचाव केंद्र स्थापन होणे गरजेचे आहे. जेणेकरून पर्यावरणप्रेमींना त्यांच्या कार्यात मोठा हातभार लागणार आहे.
जखमी प्रजातींवर होणार उपचार
तज्ञांच्या मते यावर्षी, कासवांचे वार्षिक मृत्यू आणि इजा होण्याचे प्रमाण खूपच जास्त होते. बोटींचे प्रोपेलर्स किंवा फिशनेट्समध्ये अडकण्यांसह इतर अपघातांमुळे होणारी इजा यामध्ये संपूर्ण रक्ताची कमतरता (अशक्तपणा), फुफ्फुसांना नुकसान, टाकाऊ प्लास्टिक, पाण्यातील घोस्ट नेस्ट, दोरी, रबर हे शरीरात गेल्याने पचन तंत्रामुळे नुकसान यामुळे हे समुद्री जीव बळी पडले आहेत. या केंद्रांमध्ये अशा जखमी प्रजातींवर उपचारांसह दुर्मिळ प्रजातींच्या मृत्यूची नेमकी कारणे शोधणे शक्य होणार आहे.