अध्याय सातवा
अवधुतानी यदुराजाला त्यांचे पहिले गुरु म्हणून पृथ्वी, पर्वत व वृक्ष यांची महती सांगितली. म्हणाले, पृथ्वीपासून मी परमशांती म्हणजे काय ते शिकलो. पृथ्वीशी लोक निरनिराळय़ा प्रकारचे दुर्व्यवहार करतात पण त्यांच्याबद्दल कोणताही आकस मनात न धरता, परमशांती धारण केल्यामुळे पृथ्वी त्यांचे सर्व अपराध सहन करते व त्यांना धनधान्यांनी समृद्ध करते. योग्यानेही इतरांचे अपराध सहन करून परमशांती धारण करावी. पर्वत त्यांच्याकडे असलेले मौल्यवान धातू, रत्ने इत्यादि लोकांना बहाल करून टाकतात. जो आपल्याकडील वस्तू मोकळेपणाने इतरांना देऊन टाकतो त्यांच्यावर नारायण समृद्धीचा वर्षाव करतो. म्हणून योग्याने यथाशक्ती स्वतःकडील वस्तू इतरांना दान कराव्यात. वृक्षाचेही तसेच आहे. तोही त्याच्याकडील सर्व वस्तू कसलीही अपेक्षा न करता देत असतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्व सजीवांची पराधीनता वृक्ष इतरांच्या मनावर ठसवत असतो. जे लोक स्वतःला कर्ता समजत असतात त्यांना आपण स्वतःचे स्वतः काही करू शकत नाही असा उपदेश त्यातून मिळतो. योग्यानेही ही शिकवण सदैव मनात ठेवावी व ईश्वरी प्रेरणेनुसार कार्य करत रहावे. पुढे म्हणाले, ‘राजा, माझा दुसरा गुरु वायू. वायूला दोन कारणांनी मी गुरु मानले आहे. एक प्राण म्हणून शरीरात विचरणारा आणि दुसरे म्हणजे बाह्यवायू म्हणून! योग्याने त्याच्याकडून काय घ्यावे ते सांगतो.
प्राण हा कधी विषयाची आसक्ती धरत नाही. किंवा विषय सेवन करून अहंकारी होत नाही. एखाद्या विशिष्ट आहाराचा प्राण कधी आग्रह धरत नाही. काम भागले की झाले अशी प्राणाची भूमिका असते. योग्यानेही देहाचा अभिमान धरू नये. म्हणजे अमुक एक विषयोपभोग मिळाला पाहिजे असा आग्रह धरू नये. कुठल्याही विषयाची आसक्ती धरू नये. तसेच जे खायला मिळेल त्यात समाधानी रहावे. भुकेच्यावेळी जिभेचे चोचले न पुरवत बसता, कोंडा मिळो अथवा मांडा यापैकी जे मिळेल ते गोड मानून घ्यावे. जो आहार मिळेल तो युक्तीने, धैर्याने सेवन करावा. या प्राणाप्रमाणे योग्याची वृत्ती असावी सर्व करून कशातही आसक्ती नसावी. प्राणामुळे इंद्रियांना बळ येते. सर्व प्राणीमात्रांच्या देहाला तो भेदभाव न करता आधार देतो. सर्वत्र समभाव ठेवतो. ब्रह्मादिकांचा देह पाळू आणि सुकरादिकांचा देह टाळू असा विटाळ प्राण कधी मानत नाही. वायूचे हे सर्व गुण लक्षात घेऊन ते आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. योग्याने सर्वत्र समभावना ठेवावी. आवडीच्या माणसाचे तेवढे भले करावे नावडत्या व्यक्तीचा अव्हेर करावा असे करू नये. आता बाह्यवायू बद्दल सांगतो. वायू सर्वांना स्पर्श करतो पण कुठेही गुंतत नाही.
योग्याला जरी इंद्रियांचा मेळ होऊन विषयोपभोग मिळाले तरी त्यातील गुणदोष त्याने पाहू नयेत. तसेच त्यांची आसक्ती बाळगू नये. वस्त्र, चंदन, फुले यांच्या सहवासात वायू विलास करतो पण त्यांच्यात अडकून पडत नाही. अनेक सुगंध वायूला येऊन मिळतात परंतु तो सर्वांना सोडून निघून जातो. थोडक्मयात वायूला सर्व सुखोपभोग जरी मिळाले तरी तो कशातही गुंतून पडत नाही योग्याने हे लक्षात ठेवावे. प्राण व बाह्य वायूंची ही वैशिष्टय़े लक्षात घेऊन अवधुतानी वायूला गुरु केले.