सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट- देशात 27 दिवसांनंतर आढळले तीन लाखाहून कमी रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात देशात तीन लाखाहून कमी रुग्ण आढळले आहेत. 27 दिवसांनंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणात रुग्णांमध्ये घट झाली आहे. रविवारी देशात 2 लाख 81 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 78 हजार 741 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात 35 लाख 16 हजार 997 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी शनिवारी देशात 36 लाख 18 हजार 458 इतके सक्रिय रुग्ण होते. एकंदर मागील 24 तासात सक्रिय रुग्णांमध्ये 1 लाख 1 हजार 461 ने घट झाली आहे. या आकडेवारीवरून दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत असली तरी संसर्गाची स्थिती अद्यापही पूर्णपणे मावळलेली नाही. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 4 हजार 106 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 इतक्या बाधितांची नोंद झालेली आहे. यापैकी 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 लाख 74 हजार 390 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
रिकव्हरी रेटमध्ये सुधारणा
देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा सरासरी आकडा कमी होऊन सोमवारी 18.17 टक्के वर येऊन पोहोचला आहे. नवे बाधित आणि डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मोठा फरक पडल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 84.81 टक्क्मयांवर पोहोचला आहे.
31 कोटी लोकांची झाली कोरोना चाचणी
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) माहितीनुसार, कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी रविवारी देशभरात 15 लाख 73 हजार 515 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तसेच आतापर्यंत 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्या आहेत.
पुढील तीन दिवसांत राज्यांना 51 लाख डोस
राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत 51 लाख लस डोस देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून 1.84 कोटी डोस शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 20 कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या डोसची संख्या 20 कोटी 28 लाख 9 हजार 250 अशी आहे. 14 मे रोजी वाया गेलेली लस वगळता 18 कोटी 43 लाख 67 हजार 772 डोस वापरण्यात आले आहेत. अजून 1 कोटी 84 लाख 41 हजार 478 डोस राज्यांकडे शिल्लक आहेत.