अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 23 जून 2021, सकाळी 8.45
● जिल्ह्यात 830 नवे रूग्ण ● एकूण उपरार्थ 9,267 रूग्ण ● रिक्षाचालक, व्यापारी चाचण्यांची मोहिम सुरू ● लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज ● तिसरी लाट रोखण्यासाठी कडक कारवाईची मोहिम आवश्यक ● बाजारपेठांमधील विनामास्क गर्दी वाढतेय
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असून, जिल्हा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मर्यादीत वेळेत का होईना, पण जनजीवन पुर्वपदावर आले आहे. भविष्यात तिसरी लाट येईल ही शक्यता गृहीत धरून प्रशासन सज्ज झाले असले तरी आत्ताच लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट ओसरल्याने बाजारपेठेसह रस्त्यावरील गर्दी पाहता लसीकरणाचा वेग वाढवून भविष्यातील धोका टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 830 नव्या रूग्णांची वाढ झाली असून सध्या 9,267 रूग्ण उपचारार्थ आहेत.
रिक्षाचालक, व्यापारी, फेरीवाल्यांच्या चाचण्यांना वेग
कोरोना रूग्णांची वाढ कमी होत असली तरी जिल्ह्यात स्थानिक प्रशासन चांगलेच अलर्ट झाल्याचे पहायला मिळत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने गर्दी वाढत आहे. ग्राहक आणि दुकानदार किंवा प्रवासी आणि सार्वजनिक वाहनचालक यांचा संपर्क येत आहे. यातून संसर्ग पसरू नये म्हणून सातारा, कराडसह इतर तालुक्यात स्थानिक प्रशासनाने व्यापारी, व्यावसायिक, रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांच्या कोरोना टेस्टचे कॅम्प लावले आहेत. कराड तालुक्याक दोन दिवसात 443 रिक्षाचालक, व्यापारी, भाजीविक्रेत्यांच्या कोरोना चाचण्या केल्या. अशीच मोहिम यापुढील काळातही जिल्हाभर सुरू ठेवल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता आणखी कमी व्हायला मदत होईल.
म्युकरमायकोसिसचा धोका वाढू नये
कोरोनाचा जिल्ह्याभोवतीचा विळखा कसाबसा ढिला होत आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊनच्या बंधनात अडकलेल्या जिल्हावासियांनी आत्ता कुठे मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिससह इतर धोका वाढू नये अशी भावना व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 143 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले. 26 रूग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तर 63 रुग्ण बरे झाले असून सध्या उपचारार्थ रूग्ण 54 आहेत. हा आकडा वाढू नये यासाठी उपाययोजनांची गरज असून त्या दृष्टीने रूग्णालयांना सुचना देण्याची गरज आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 9,98,630, एकूण बाधित 1,87,888, घरी सोडण्यात आलेले 1,77,191, मृत्यू 4,239, उपचारार्थ रुग्ण 9,267
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 830, मुक्त 759, बळी 18