रस्त्यावर शुकशुकाट, पण फेरविचार करावा, खानापूर तालुक्यातील जनतेची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. खानापूर तालुक्यात गेला विकेंड लॉकडाऊनही यशस्वी झाला होता. तर या वेळचा लॉकडाऊनदेखील शंभर टक्के यशस्वी झाला. शनिवारी तर शहरातील मुख्य रस्त्यावर एकप्रकारचा शुकशुकाटच पसरला होता. तर रविवारचा आठवडी बाजार असूनदेखील विकेंड लॉकडाऊनमुळे भाजीविक्रेते तसेच इतर वस्तू विक्रेत्यांनी देखील आठवडी बाजाराकडे पूर्णतः पाठ फिरविली होती. यामुळे रविवारी देखील शहरातील मुख्य रस्त्यावर एकप्रकारे शुकशुकाटच निर्माण झाला होता.
विकेंड लॉकडाऊनमध्ये शहरातील केवळ किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, भाजीपाला, फळफळावळची दुकाने उघडी होती. पण गिऱहाईकांची कमतरता होती. यामुळे प्रत्येक दुकानदार गिऱहाईकांच्या प्रतिक्षेत बसले होते. हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सलची मुभा देण्यात आली होती. यामुळे ठराविक हॉटेल उघडी होती. या विकेंड लॉकडाऊनमध्ये कापड दुकाने, गोल्डस्मिथ, सलून, स्टेशनरी तसेच भांडय़ाची दुकानेही बंद ठेवण्याचा प्रशासनाने आदेश दिला आहे. त्यानुसार या वेळच्या विकेंड लॉकडाऊनमध्येही ती सर्व दुकाने बंदच होती.
मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर शहर तसेच तालुक्यातील कापड व्यापारी, गोल्डस्मिथ, सलून व्यावसायिक, स्टेशनरी, ब्युटी पार्लर, भांडी व्यावसायिकानी मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाचा फेरविचार करावा व लॉकडाऊनसंदर्भात इतर नियम कडक करून सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबतीत प्रशासनाकडून केवळ आमच्यासारख्या व्यवसायिकावर अन्याय का, जर विकेंड लॉकडाऊन करायचाच असेल तर केवळ डॉक्टर, औषधे दुकाने तसेच दूध विक्री वगळून इतर सर्वच व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असता, तर कुणावरही अन्याय होण्याचा प्रश्न नव्हता, अशी प्रतिक्रिया त्या व्यावसायिकांनी व्यक्त केली.
या लॉकडाऊनमुळे दोन्ही दिवस तालुक्यातील बससेवाही विस्कळीत झाली होती. खानापूर आगाराने काही मार्गावरच्या बससेवा सुरू ठेवल्या होत्या. पण त्यामध्ये बसचालक व वाहकाना प्रवाशांची वाट पहात थांबावे लागत होते. खासगी प्रवासी वाहने तर संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. या लॉकडाऊनमुळे जांबोटी क्रॉसवरील मुख्य बसस्थानक तसेच राजा शिवछत्रपती स्मारकाजवळील बसस्थानकावरही प्रवाशांची वर्दळ बऱयाच प्रमाणात घटल्याचे चित्र निर्माण झाले होते. एकीकडे दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने दोन्ही दिवसाचा संपूर्ण भार सोमवारच्या व्यवहारावर पडत आहे. सोमवारी खानापूर शहरातील स्टेशनरोड, बाजारपेठ, चिरमुरकर गल्ली आदी ठिकाणी किराणा माल, भाजीपाला, फळफळावळ तसेच इतर वस्तू खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे शनिवार, रविवार लॉकडाऊन पाळण्यात आला तरी त्याचा परिणाम सोमवारी दिसून येत आहे. सोमवारी होणाऱया वाढत्या गर्दीत अनेकांच्या तोंडावर मास्कही नसते. कोरोना नियमांची एकप्रकारे पायमल्लीच झाल्याचे चित्र असते. एखाद्यावेळी विकेंड लॉकडाऊन रद्द केला तर सोमवारी होणारी गर्दी रविवार व सोमवार अशा दोन्ही दिवशी विभागून जाऊ शकते. यामुळे कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी देखील प्रशासनालाही सोपे जाऊ शकते.