बेळगाव / प्रतिनिधी
राज्य सरकारच्या आदेशानुसार सलग दुसऱया आठवडय़ात विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला. दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. त्यानंतर मात्र शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजारपेठेसह इतर मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांना येणे-जाणे कठीण झाले.
शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून विकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली. पोलिसांनी दुकाने बंद करण्यास लावल्याने रात्रीपासून शहर व उपनगरांमध्ये शुकशुकाट होता. शनिवारी सकाळी भाजीपाला, दूध, फळे, किराणा मालाची दुकाने तसेच खाद्यपदार्थांची दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. शनिवारी आठवडी बाजार असल्याने बाजार परिसरात गर्दी होती. दुपारी 1 वाजता पोलिसांनी दुकाने बंद करायला लावली. त्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
शहरात एक तर उपनगरात एक न्याय का?
बेळगाव शहरात विकेंड कर्फ्यूची अंमलबजावणी केली जात आहे. दुपारनंतर बाजारात शुकशुकाट असतो. परंतु उपनगरांमध्ये मात्र सर्व व्यवहार खुलेआम सुरू आहेत. त्यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसत आहे. यामुळे शहरांतर्गत व्यापाऱयांमधून नाराजी व्यक्त होत असून नियम लावायचेच असतील तर नियम सर्वांना सारखेच लावावेत, अशी मागणी होत आहे.
हॉटेल बंद पण पार्सल सेवा तेजीत
नियमावलीनुसार हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. परंतु ग्राहकांना पार्सल सेवा देण्यात येत होती. यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर करून आस्वाद घेता आला. त्यामुळे दुपारनंतर पार्सल सेवा देणाऱयांचा संचार सर्वत्र दिसत होता. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.