भारताचे 540 धावांचे आव्हान, न्यूझीलंड दुसऱया डावात 5 बाद 140
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱया कसोटीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून तिसऱया दिवशीअखेर न्यूझीलंडने 540 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱया डावात 5 बाद 140 धावा जमविल्या होत्या. भारताला विजयासाठी आणखी पाच बळी मिळविण्याची गरज आहे. न्यूझीलंडच्या डॅरील मिशेलने अर्धशतक नोंदवले तर हेन्री निकोल्सने भारतीय फिरकीचा प्रतिकार करीत नाबाद 36 धावा जमविल्या.
भारताने पहिल्या डावात 325 धावा जमविल्यानंतर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांच्या भेदक माऱयापुढे न्यूझीलंडचा पहिल्या डावात केवळ 62 धावांत धुव्वा उडाला. त्यानंतर भारताने दुसरा डाव रविवारी 7 बाद 276 धावांवर घोषित करून न्यूझीलंडला 540 धावांचे कठीण आव्हान दिले.
भारताने तिसऱया दिवशी बिनबाद 69 या धावसंख्येवरून खेळाला सुरुवात केली. मयांक अगरवाल व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी सलामी दिल्यानंतर एजाझ पटेलने ही जोडी फोडताना मयांकला यंगकरवी झेलबाद केले. पहिल्या डावात 150 धावांची खेळी करणाऱया मयांकने 108 चेंडूत 9 चौकार, एक षटकारांच्या मदतीने 62 धावा जमविल्या. नंतर पुजाराही फारवेळ टिकला नाही. त्यालाही पटेलने टेलरकरवी झेलबाद केले. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या पुजाराने यावेळी 47 धावांचे योगदान दिले. 97 चेंडूंच्या खेळीत त्याने 6 चौकार व एक षटकार नोंदवला. 2 बाद 115 नंतर शुभमन गिल (47) व कर्णधार कोहली (36) जोडी रंगात आली असताना रचिन रविंद्रने गिलला झेलबाद केले. 75 चेंडूत गिलने 4 चौकार, एक षटकार ठोकला. श्रेयस अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला. जलद धावा करण्याच्या प्रयत्नात तो पटेलच्या गोलंदाजीवर यष्टिचीत झाला. त्याने 8 चेंडूत 14 धावा करताना 2 षटकार फटकावले.
कोहलीने 84 चेंडूत 36 धावा जमविताना 1 चौकार, 1 षटकार मारला असला तरी त्याच्या खेळीत पुरेसा आत्मविश्वास दिसला नाही. रविंद्रने कोहलीला बाद करीत दुसरा बळी नोंदवला. वृद्धिमान साहा देखील 12 चेंडूत 13 धावा जमवू शकला. पण अक्षर पटेलने आक्रमक फटकेबाजी करीत केवळ 26 चेंडूत नाबाद 41 धावा फटकावल्या. त्यात 3 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. जयंत यादवसमवेत त्याने सातव्या गडय़ासाठी 28 चेंडूत 38 धावांची भर घातली. यादवला पटेलने बाद केल्यानंतर कोहलीने डावाची घोषणा केली. पटेलचा या डावातील हा चौथा बळी होता. यादवने 6 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या पटेलने पहिल्या डावात 10 बळी मिळवित विश्वविक्रमाशी बरोबरी करीत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. या डावात त्याने 106 धावांत 4 बळी मिळविले. रचिन रविंद्रने 56 धावांत 3 बळी मिळविले.
न्यूझीलंडची खराब सुरुवात
न्यूझीलंडच्या दुसऱया डावाची सुरुवात मात्र खराब झाली. प्रारंभीच अश्विनने नव्या चेंडूवर फिरकी मारा करताना हंगामी कर्णधार टॉम लॅथमला पायचीत करून पहिले यश मिळविले. यावेळी फलकावर 13 धावा लागल्या होत्या. चहापानानंतर 1 बाद 13 धावांवर खेळ पुढे सुरू केल्यानंतर अश्विनने न्यूझीलंडला आणखी धक्के दिले. विल यंगला त्याने फॉरवर्ड शॉर्टलेगला झेल देण्यास भाग पाडले तर अनुभवी रॉस टेलर अश्विनला स्वीप करताना पुजाराकरवी झेलबाद झाला. डॅरील मिशेल आश्वासक फलंदाजी करीत होता. त्याने जयंत यादव व अक्षर पटेल यांच्यावर हल्ला चढवित काही चौकारही वसूल केले. पण अखेर अक्षर पटेलला उत्तुंग फटका मारताना तो जयंत यादवकडून झेलबाद झाला. त्याने 92 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 60 धावा जमविल्या. हेन्री निकोल्ससह त्याने चौथ्या गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी केली. टॉम ब्लंडेल चोरटी धाव घेताना धावचीत झाला. दिवसअखेर निकोल्स 36 व रचिन रविंद्र 2 धावांवर खेळत होते. भारताच्या अश्विनने 3 तर अक्षर पटेलने एक बळी मिळविला. किवीजना अद्याप 400 धावांची गरज असून त्यांचा पराभव अटळ आहे. उर्वरित पाच फलंदाजांना बाद करून भारत सामन्यासह मालिका जिंकण्याच्या मार्गावर आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत पहिला डाव 325, न्यूझीलंड पहिला डाव 62, भारत दुसरा डाव 70 षटकांत 7 बाद 276 डाव घोषित ः मयांक अगरवाल 62 (108 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), पुजारा 47 (97 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल 47 (75 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), कोहली 36 (84 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर 14 (8 चेंडूत 2 षटकार), साहा 13 (12 चेंडूत 2 चौकार), अक्षर पटेल नाबाद 41 (26 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), जयंत यादव 6, अवांतर 10. गोलंदाजी ः एजाझ पटेल 4-106, रचिन रविंद 3-56, सॉमरव्हिले 0-59, जेमीसन 0-15, साऊदी 0-31.
न्यूझीलंड दुसरा डाव 45 षटकांत 5 बाद 140 ः लॅथम 6, यंग 20 (41 चेंडूत 4 चौकार), डॅरील मिशेल 60 (92 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), रॉस टेलर 6, निकोल्स खेळत आहे 36 (86 चेंडूत 7 चौकार), ब्लंडेल 0, रविंद्र खेळत आहे 2, अवांतर 10. गोलंदाजी ः अश्विन 3-27, अक्षर पटेल 1-42, यादव 0-30, उमेश यादव 0-19, सिराज 0-13.
एजाझ पटेलची किवीजतर्फे दुसरी सर्वोत्तम कामगिरी
डावात दहा बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी करणाऱया एजाझ पटेलने सामन्यात 14 बळी घेत न्यूझीलंडतर्फे दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली. त्याने 225 धावांत 14 बळी मिळविले. त्याच्या या कामगिरीचा त्यांच्या फलंदाजांना मात्र लाभ उठविता आला नाही. याआधी सर रिचर्ड हॅडली यांनी 1985 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत 123 धावांत 15 बळी मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. मात्र भारताविरुद्ध असा पराक्रम करणारा पटेल हा एकमेव गोलंदाज आहे.
अगरवाल, गिल जखमी
भारताचे सलामीवीर मयांक अगरवाल व शुभमन गिल दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या दुसऱया डावात क्षेत्ररक्षणास आले नव्हते. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव व श्रीकर भरत यांनी क्षेत्ररक्षण केले. दुसऱया डावात फलंदाजी करताना मयांकच्या मनगटाला चेंडू लागला. त्यामुळे दक्षता म्हणून त्याला क्षेत्ररक्षण न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शनिवारी क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिलच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटास दुखापत झाल्याने तो रविवारी क्षेत्ररक्षणास मैदानात उतरला नाही, असे बीसीसीआयच्या मीडिया टीमने सांगितले.