मुख्यमंत्री येडियुराप्पा -कोरोना पॉझिटिव्हीटीचा विचार करून निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणारे जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. तर राज्यातील 11 जिल्हय़ांमधील लॉकडाऊन 21 पर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत अनलॉकविषयी निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
जिल्हय़ांमधील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन दुसऱया टप्प्यातील अनलॉकविषयी निर्णय घेतला जाणार आहे. दुसऱया टप्प्यात अनलॉक प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रांना मुभा द्यावी, याबाबत तज्ञांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या जिल्हय़ांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथील नियम शिथिल करावे का, याविषयी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले.
संसर्ग कमी असणाऱया बेंगळूरसह राज्यातील इतर जिल्हय़ांमधील परिस्थिती पूर्वप्रदावर येत आहे. तेथील कोरोना परिस्थिती विचारात घेतल्यानंतर कोणत्या जिल्हय़ांमध्ये दुसऱया टप्प्यातील अनलॉक जारी करावा, याबाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेण्यात येईल. बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील परिस्थितीचे अवलोकन करण्यात येईल. त्यानुसार पुढील भूमिका ठरणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात 14 दिवसांच्या कालावधीचे दोन लॉकडाऊन आणि 7 दिवसांच्या तिसऱया लॉकडाऊनंतर राज्यातील 19 जिल्हय़ांमधील कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांच्या खाली आला. त्यामुळे या जिल्हय़ांमध्ये 21 जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील अनलॉक जारी करण्यात आला होता. तर संसर्ग अधिक असणाऱया बेळगावसह 11 जिल्हय़ांमध्ये नियम शिथिल करण्यात आले नाहीत. आता राज्यातील तीन-चार जिल्हे वगळता इतर जिल्हय़ांमध्ये संसर्ग बऱयापैकी आटोक्यात आला आहे. त्यामुळे या जिल्हय़ांमध्येही अनलॉकची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या स्वरुपात नियम शिथिल करावेत, याबाबत अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही.