16 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार : 27 रोजी मतदान
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 22 आणि 27 डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. याच दरम्यान, शुक्रवारपासून दुसऱया टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. संबंधित जिल्हय़ाचे जिल्हाधिकारी निवडणूक अधिसूचना जारी करतील.
दुसऱया टप्प्यातील ग्रा. पं. निवडणुकीसाठी 16 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 17 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी वैध अर्जांची घोषणा होईल. 19 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल. 27 रोजी मतदान होणार असून पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 30 डिसेंबर रोजी होणार आहे.
दुसऱया टप्प्यात बेळगाव जिल्हय़ातील सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग जिल्हय़ांमध्ये निवडणूक होत आहे. त्याचप्रमाणे बागलकोट जिल्हय़ातील बागलकोट, हुनगुंद, बदामी, इळकल, गुळेदगुड्ड या तालुक्यांमध्ये, तसेच धारवाड जिल्हय़ात हुबळी, कुंदगोळ, नवलगुंद, अण्णीगेरी या तालुक्यांत, विजापूर जिल्हय़ातील इंडी, चडचण, सिंदगी, देवरहिप्परगी, कारवार जिल्हय़ात शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर, मुंडगोड, हल्याळ, दांडेली आणि जोयडा तालुक्यांमध्ये दुसऱया टप्प्यात निवडणूक होणार आहे. या ठिकाणी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. राज्यातील एकूण 5,762 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. 35,884 वॉर्डांमधील 92,121 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दुसऱया टप्प्यात 2,832 ग्रा. पं. साठी निवडणूक होत आहे.