बेळगाव / प्रतिनिधी :
केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांना बारा अंकी नंबरचा टॅग लावून जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपलोड केली जात आहे. या योजनेतील दुसऱया टप्प्याला सुरुवात करण्यात आली असून टॅग न लावून घेतलेल्या पशुपालकांनी जनावरांच्या कानांना टॅग लावून घ्यावेत, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. तालुक्मयातील पहिल्या टप्प्यात निम्म्याहून अधिक जनावरांना टॅग लावण्यात आले असून उर्वरित जनावरांना टॅगिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.
सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांतून जनावरांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याबरोबर मोफत टॅगिंग करण्यात येत आहे. टॅगमुळे जनावरांची खरेदी-विक्री, प्रजनन क्षमता, रोगप्रतिबंधक लसी, लागणारा औषध पुरवठा, कृत्रिम रेतन या बाबींची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे आता दुभत्या जनावरांबरोबर बैल, म्हशी, शेळी-मेंढींना टॅग लावणे बंधनकारक आहे. जनावरांच्या कानांना टॅग लावल्यानंतर जनावरांचे वय, उंची, आहार याची माहिती ‘इनाफ’ या सॉफ्टवेअरमध्ये नोंद केली जात आहे.
या टॅगमुळे जनावरांची एकूण निर्दिष्ट संख्या, जनावरांची खरेदी-विक्री, प्रजनन क्षमता, रोगप्रतिबंधक लसी, लागणारा औषध पुरवठा, कृत्रिम रेतन या बाबींची नोंद ठेवता येणार आहे. त्याचबरोबर जनावरांची चोरी झाल्यास टॅगवरून मूळ मालक ओळखण्यास मदत होणार आहे. यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या कानावर टॅग लावून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.