जीडीपी विकास दर 6.3 टक्के, मागणीत वाढ, महत्वाच्या क्षेत्रांमध्ये वृद्धी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जुलै ते सप्टेंबर या दुसऱया तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर 6.3 टक्के इतका नोंद झाला आहे. संपूर्ण जगात मंदी अवतरण्याची भाषा होत असताना भारताने गाठलेल्या या विकासदराचे महत्व मोठे आहे, असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे.
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकासदर 13.5 टक्के इतका होता. तो एक वर्षातील सर्वाधिक नोंदला गेला होता. दुसऱया तिमाहीत यात घसरण झाली असली तरी नैसर्गिक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दुसऱया तिमाहीच्या विकासदराचे अंतिम आकडे अद्याप आलेले नाहीत. ते आल्यानंतर त्यात काही प्रमाणात वाढ झालेली दिसेल अशीही माहिती देण्यात आली आहे.
मागणीत वाढ
दुसऱया तिमाहीत मागणीत वाढ दिसून आल्याने विकासदर अधिक राहण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या याच तिमाहीत विकासदर 8.4 टक्के होता. तो यंदा कमी असला तरी अंतिम आकडेवारीत तो 7 टक्क्यांहून अधिकपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. एकंदर, जगाशी तुलना करता भारताची अर्थव्यवस्था जास्त बळकट पायावर उभी असल्याचे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया बाजाराने व्यक्त केली.
भांडवली खर्चात वाढ
सप्टेंबरच्या तिमाहीत भांडवली खर्चात वाढ झालेली आहे. ही वाढ सरकारने केली आहे. या तीन महिन्यांमध्ये 20.45 अब्ज डॉलर्सचा भांडवली खर्च सरकारने केला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत केलेल्या खर्चापेक्षा तो 40 टक्के अधिक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असूनही भारताने दुसऱया तिमाहीत लक्षणीय विकासदर गाठला आहे.
वित्तीय तूट नियंत्रणात
एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांमध्ये देशाची वित्तीय तूट नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. या कालावधीत वित्तीय तूट 7.58 लाख कोटी रुपये इतकी आहे. ती अनुमानित वार्षिक तुटीच्या 45.6 टक्के आहे. अद्याप हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. म्हणजेच निम्म्यापेक्षा अधिक आर्थिक वर्ष संपले आहे. पण वित्तीय तूट अनुमानित तुटीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण असल्याचे मानले जात आहे.
करउत्पन्नात वाढ
या वित्तवर्षाच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये करउत्पन्न 11.71 लाख कोटींवर पोहचले आहे. तर एकंदर खर्च 21.44 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. सेवा क्षेत्राची प्रगती लक्षणीय आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने हॉटेल, पर्यटन, रेस्टॉरंट्स्, वाहतूक आणि इतर सेवा वेगाने वाढत आहेत. यामुळे विकासाला चालना मिळणार आहे, असे अनेक अर्थतज्ञांनी स्पष्ट केले आहे.
आठ महत्वाची क्षेत्रे
अर्थव्यवस्थेचा आधार मानल्या गेलेल्या आठ महत्वाच्या क्षेत्रांचा विकास दर 0.1 टक्क्याने मंदावला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये हा विकासदर 8.7 टक्के होता. ऑक्टोबर 2022 मध्ये तो 8.6 टक्के इतका आहे. जरी त्यात घट झाली असली तरी ती अत्यल्प असल्याने ती चिंताजनक नाही, असे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 7.8 टक्के होता. त्यात काहीही वाढ ऑक्टोबरमध्ये झाली आहे.
तुलनात्मक दृष्टीकोन आवश्यक
अर्थव्यवस्थेतील चढउतार पाहताना आपल्या अर्थव्यवस्थेची जगाच्या अर्थव्यवस्थेशी तुलना करणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे मत आहे. बहुतेक सर्व मोठय़ा राष्ट्रांचा विकासदर उणे 1 टक्का ते 2 टक्के या मर्यादेत वाढत आहे. भारताने मात्र आतापर्यंत गेल्या तीन तिमाहींमध्ये सरासरी विकासदर 7 टक्के राखला आहे.
अर्थव्यवस्थेची गती राहणार
ड दुसऱया तिमाहीतील आकडेवारीने तिसऱया तिमाहीच्या अपेक्षा वाढविल्या
ड जगाच्या तुलनेत भारताचा विकासदर बराच पुढे, चीनलाही टाकले मागे
ड आठ महत्वाच्या क्षेत्रांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अत्यल्प विकास घट