प्रतिनिधी / पणजी
कोरोनाची दुसरी लाट ही प्रथम लाटेपेक्षा फारच वेगळी आहे. ती अधिक गंभीर आहे. त्यामुळे लोकांनी तिचे गांभीर्य ओळखावे, वरकरणी घेऊ नये, असा कळकळीचा सल्ला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिला आहे.
आरोग्य खात्यातर्फे पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आरोग्य सचिव रवी धवन व संचालक डॉ. जोस डिसा उपस्थित होते. एखाद्याला चुकूनसुद्धा ताप आल्यास त्याने त्वरित होम आयसोलेशनसंबंधीची आचारसंहिता पाळावी. अँटीबायोटिक्स घ्यावे. एखाद्यास मधुमेह असेल आणि कोरोना पोझिटिव्ह असेल तर इन्सुलीन सुरू करावे. अन्यथा अशा रुग्णांना न्युमोनिया होऊ शकतो व त्यातच त्यांचे प्राण जाण्याची भीती अधिक असते. ताप आल्यानंतर चार-पाच दिवसांचा उशीरसुद्धा प्राणघातक ठरू शकतो. एकदा फुफ्फूस खराब झाले की नंतर कितीही प्राणवायू दिला तरी माणूस जगू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, स्वतःबद्दल बेपर्वा होऊ नये, असे बांदेकर म्हणाले.
संबंधित आचारसंहिता सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे. तरीही एखाद्यास त्याबद्दल माहिती नसेल तर 104 या हॅल्पलाईनवरून संपर्क करावा. त्यांना सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येते. तरीही एखाद्यास अधिक माहिती हवी असल्यास स्वतः आपण सदैव उपलब्ध असेन असेही डॉ. बांदेकर म्हणाले. त्याशिवाय आरोग्य संचालक डॉ. डिसा यांनाही थेट फोन करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरणाची गरज का?
लसीकरणाची गरज काय यावर बोलताना डॉ. बांदेकर यांनी, दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाली, अशा तक्रारी येत आहेत. परंतु त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही, कारण ही लस 100 टक्के सुरक्षेची खात्री देत नसली तरीही त्याद्वारे 60 ते 80 टक्के सुरक्षितता नक्की मिळते. तसेच लस घेतलेल्यांना झालेल्या कोरोनाचा प्रभाव बऱयाच प्रमाणात कमी आहे. त्यांना न्युमोनिया होण्याचे प्रमाण कमी आहे, याचाच अर्थ अशा रुग्णांचे प्राण जाण्याची भीती कमी असते. म्हणुनच ही लस महत्वाची आहे, त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे बांदेकर म्हणाले.
असे असले तरीही हा आजार वाटतो तेवढा साधा नाही. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की ही लाट अधिक प्रभावी, दाहक आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. योग्य काळजी हाच यावरील प्राथमिक उपाय आहे. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावे, सामाजिक अंतर पाळावे. सरकारने कितीही लॉकडाऊन केले आणि लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन केले नाही, तर कोरोना रोखणे शक्य होणार नाही.
गोमंतकीय सुखरूप असावे यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कसोसीने प्रयत्न करत आहेत. आरोग्य खाते चोवीस तास कार्यरत आहे. त्या प्रयत्नांना प्रत्येकाचे सहकार्य मिळणे क्रमप्राप्त आहे, असे बांदेकर यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या प्रतिदिन 7 ते 8 प्लाज्माची आवश्यकता भासते. त्याशिवाय खाजगी इस्पितळाकडून मागणी झाल्यास त्यांना प्लाज्मा तसेच रेमडेसीवीरही पुरविण्यात येतो. शेवटी रुग्ण कुठेही असला तरी त्याचे प्राण वाचणे महत्वाचे असते. गोमेकॉच्या रक्तपेढीत सध्या 30 पेक्षा जास्त प्लाज्मा उपलब्ध आहे. ही संख्या कमी असली तरीही भविष्यात आणखी दाते पुढे येतील अशी अपेक्षा बांदेकर यांनी व्यक्त केली.
डॉ. डिसा यांनी लसीकरण आणि अन्य कार्यक्रमांसंबंधी माहिती दिली. सध्या 9107 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत तर आतापर्यंत 45 आणि त्यावरील वयाच्या सुमारे 2 लाख 11 हजार 906 जणांना लसीचा प्रथम डोस देण्यात आला आहे. 54 हजार 729 जणांना द्वितीय डोस देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.