कोरोना महामारीचा प्रभाव : 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले : चांगल्या नोकरी मिळण्यास एक वर्ष लागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे देशात 1 कोटींहून अधिक भारतीयांना रोजगार गमवावा लागला आहे. तसेच 97 टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. खासगी थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) सीईओ महेश व्यास यांनी हा दावा केला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत देशाचा बेरोजगारी दर 12 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. एप्रिलमध्ये बेरोजगारी दर 8 टक्के होता.
मागील वर्षी देशव्यापी लॉकडाउनमुळे मे महिन्यात बेरोजगारी दर उच्चांकी 23.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. संक्रमणाच्या दुसऱया लाटेचा जोर ओसरू लागल्याने राज्ये आता हळूहळू आर्थिक हालचालींवरील निर्बंध हटवू लागले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला मदत मिळणार असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे.
रोजगारावर कोरोनाचे दुष्परिणाम
नोकरी गमावलेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळणे अवघड आहे. असंघटित क्षेत्रात नोकरी लवकर मिळेल, पण गुणवत्तापूर्ण रोजगार आणि संघटित क्षेत्रात रोजगाराची संधी निर्माण होण्यास एक वर्षापर्यंतचा कालावधी लागणार आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली होऊ लागल्याने बेरोजगारीच्या समस्येवर काही प्रमाणात मात करता येईल. पण समस्या पूर्णपणे संपुष्टात येणार नसल्याचे सीएमआयईकडून म्हटले गेले आहे. सद्यस्थितीत लेबर पार्टिसिपेशन रेट कमी होत 40 टक्क्यांवर आला आहे. महामारीपूर्वी हा दर 42.5 टक्के इतका होता.
भारत अन् बेरोजगारीचा दर 3-4 टक्क्यांचा बेरोजगारी दर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालू शकतो. पुढील काळात बेरोजगारी दर कमी होणार असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे. सीएमआयईने एप्रिलमध्ये 1.75 लाख कुटुंबांवर एक देशव्यापी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मागील एक वर्षात कमाईचा चिंताजनक ट्रेंड समोर आला होता. सर्वेक्षणात केवळ 3 टक्के कुटुंबांनी स्वतःचे उत्पन्न वाढल्याचे नमूद पेले होते. तर 55 टक्के कुटुंबांनी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले होते. उर्वरित 42 टक्के कुटुंबांनी उत्पन्नात कुठलाच बदल झाला नसल्याचे म्हटले होते. पण महागाईच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे.