हॉटस्प्रींग भागातील सैन्यमाघारीसंदर्भात ड्रगनसोबत निष्फळ ठरलेली चर्चा आणि जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्हय़ात सीमेपलीकडून झालेली घुसखोरी यामुळे ड्रगन व पाकिस्तान या दोन शेजारी देशांबरोबरील भारताचा सीमासंघर्ष आता अधिक टोकाला गेल्याचे दिसते. जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांपासून लष्कर व दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी झडत आहेत. दोन दिवसांत या टापूत तब्बल पाच चकमकी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यात लष्करातील सुभेदारासह पाच जवानांना वीरगती मिळाली असून, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. तसा या दोन देशांमधील संघर्ष नवा नाही. मात्र, सीमेवरील हिंसक घटनांमध्ये अलीकडे अधिक वाढ झालेली दिसून येते. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली असून, दहशतवाद्यांनी पाच दिवसांत सात निरपराध नागरिकांचे बळी घेत एकप्रकारे सुरक्षा यंत्रणांना इशाराच दिला होता. लष्कर व दहशतवादी यांच्यातील चकमकी हा त्याचाच पुढचा अंक असून, पुढच्या टप्प्यात हा संघर्ष टिपेला पोहोचण्याची शक्यता संभवते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर हा देश पुन्हा तालिबानच्या कब्जात आला आहे. स्वाभाविकच सांप्रत सत्तांतर आणि काश्मिरातील हिंसा यांचा परस्परांशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढल्यास ते अवास्तव ठरणार नाही. मागच्या काही दिवसांमध्ये काश्मिरातून काही तरुण गायब झाल्याचीही वदंता आहे. या तरुणांचा वापर पाकिस्तान व तालिबानकडून दहशतवादासाठी केला जाऊ शकतो, असे म्हणायला जागा आहे. त्यामुळे भारताला अधिक सतर्क भूमिका घ्यावी लागेल. पाक गुप्तचर संघटना आयएसआय चर्चेत असो वा नसो. त्यांच्या कारवाया अविरतपणे सुरू असतात. पाकला युद्धात सातत्याने मार खावा लागल्याने याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतावर निशाणा साधण्यातच आयएसआयसारख्या संघटना, तेथील सैन्यदल धन्यता मानते. पाकच्या अशा सगळय़ा खेळय़ांना पुरून उरण्यासाठी यापुढेही कमालीची दक्षता बाळगावी लागेल. दुसऱया बाजूला मागच्या काही महिन्यांपासून चीन व भारत यांच्यातील संघर्षही टीपेला पोहोचलेला पहायला मिळतो. गेल्या सहा-सात दशकांच्या कालखंडात चर्चेच्या माध्यमातून दोन देशांतील संबंध दृढ करण्याबाबत भारताने नेहमीच पुढाकार व समन्वयवादी भूमिका घेतल्याचा इतिहास आहे. मात्र, चर्चेचे नाटक करायचे नि पुन्हा फुत्कार काढायचे, ही चीनची जुनी खोड अद्यापही संपलेली नाही. मागील वर्षी चिनी सैन्याने गलवान भागात घुसखोरी केली होती. त्या वेळी दोन देशांतील सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. 45 वर्षांतील सर्वांत मोठय़ा मानल्या जाणाऱया या संघर्षांत भारतानेही चीनला जबरदस्त प्रतिकार करताना आपली खरी ताकद दाखवून दिली. त्यानंतरच्या चर्वितचर्वणानंतर डॅगनकडून एक पाऊल मागे घेण्यात आले असले, तरी संयुक्तऐवजी स्वतंत्रपणे पत्रक काढण्याचा दोन देशांचा निर्णय नि चीनचा एकूणचा पिंड पाहता ही माघारी क्षणजीवी ठरणार, हे निश्चितच होते. त्याचाच प्रत्यय मागच्या काही दिवसांतील घटनांवरून येतो. उत्तराखंडमधील बाराहोटी भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 100 सैनिकांनी अलीकडेच सीमेचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर लडाखमध्येही ड्रगनच्या कुरापती सुरूच दिसतात. पँगाँग सरोवर गोगरा चौकीच्या उत्तर तसेच दक्षिण काठावरील चिनी सैनिक मागे हटले असले, तरी हॉट स्प्रिंग्सवर मोठय़ा प्रमाणात सैन्य तैनात असून, ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणता येईल. खरे तर सीमावादावर या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये सातत्याने चर्चा होत आहेत. मात्र, चीनचा आडमुठेपणाच कमी होणार नसेल, तर त्यातूक काय तोडगा निघणार, असा प्रश्न आहे. वास्तविक एलएसीला लागून असलेल्या वादग्रस्त भागासंदर्भातील वाद मिटावेत, याकरिता काही सकारात्मक बदल भारताकडून चीनला सुचविण्यात आले होते. मात्र, भारताच्या मागण्या या अवास्तव व अतर्क्य असल्याचा दावा करीत ड्रगनने या सूचना अमान्य केल्या आहेत. अर्थात चर्चा सुरू ठेवण्यावर दोन्ही देशांकडून सहमती दर्शविण्यात आली, हे चांगलेच. तरी चीन आपला हेका असाच कायम ठेवणार असेल, तर या चर्चेचे फलित ते काय असेल, हे न उलगडणारे कोडे आहे. वास्तविक, चीन हा प्रचंड महत्त्वाकांक्षी देश आहे. जागतिक महासत्ता हे स्थान या देशाला अमेरिकेकडून हिसकावून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आशिया व हिंदी महासागराच्या टापूतही त्यांना आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठीच आपला विस्तारवादी फॉर्म्युला हे राष्ट्र अधिक आक्रमकपणे रेटू पाहत आहे. मागच्या काही काळात दोन देशांच्या सीमा प्रदेशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचा सपाटाच चीनने लावला आहे. त्यामागचा हेतू आता लपून राहिलेला नाही. भारताला चीनपासूनच सर्वाधिक धोका असल्याचे विधान माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी केले होते. हा इशारा किती दूरगामी विचार करणारा होता, हे सध्याच्या घटनांवरून ध्यानात येते. भविष्यात भारतालाच नव्हे, तर नेपाळ, श्रीलंका, म्यानमार या देशांनाही चीनच्या विस्तारवादाची झळ बसू शकते. हिंदी महासागरातील वर्चस्वावरून जपानशीही या देशाचे संबंध ताणले गेलेले आहेत. तर अमेरिका व चीनमध्येही नवे शीतयुद्ध झडू पाहत आहे. हा सगळा जागतिक राजकारणाचा पोत लक्षात घेऊनच भारताला राजकीय व परराष्ट्रीय चातुर्य दाखवावे लागेल. त्याचबरोबर चीनविरोधात नवी आघाडी उभी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारत हा पाक आणि चीन यांच्यासाठी समान शत्रू आहे. दोन्ही आघाडय़ांवर भारताला झुंजवत ठेवण्याचा त्यांचा डाव असू शकतो. उद्या तालिबानही त्यांना मिळाला, तर आश्चर्य वाटायला नको. अशा तीन तिघाड, काम बिघाडांपासून आपल्याला सावधानता बाळगावी लागेल. पाकिस्तान व चीनचे आव्हान हे दुहेरी असून, ते वाटते तितके सोपेही नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्यसज्जता व मुत्सद्देगिरी या दोन्ही आघाडय़ांवर नेटाने लढावे लागेल.
Trending
- जम्मू आणि काश्मीरच्या अर्नास भागात दहशतवादी लपण्याचे ठिकाण पोलिसांनी केले उद्ध्वस्त, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
- सिंधुदुर्ग -रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार !
- उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही ? मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- प्रा. संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी, राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा
- एलोन मस्क यांचा भारत दौरा, पंतप्रधान मोदींसोबतची बैठक पुढे ढकलली
- गुजरातच्या कच्छमध्ये सापडले सर्वात मोठे प्राचीन सापाचे जीवाश्म
- मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांनी केले सांत्वन