एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू तर नऊ सुखरुप बाहेर
प्रतिनिधी / सरवडे
काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यात दहा गवारेड्यांचा कळप पडल्याने एका गव्याचा मृत्यू झाला मात्र अन्य नऊ गवे लोकांच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप बाहेर पडले. ही घटना आज पहाटे कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या हद्दीत घडली. कडक उन्हाळ्यामुळे जंगलात पाणी मिळत नसल्याने गवे पाण्यासाठी कालव्यात उतरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, उंदरवाडी गावातील एन.के.जाधव हे आज सकाळी डोंगराकडील शेताकडे फिरायला गेले होते. यावेळी बेलजाई मंदिराच्या शेजारी कालव्यात त्यांना गव्यांचा कळप पडल्याचे दिसले. याबाबत त्यांनी अन्य ग्रामस्थांना माहिती दिली. त्यापैकी रंगराव कुदळे, भूषण पाटील, संभाजी पाटील, अनिकेत कुदळे यांनी कालव्याच्या पाण्यात उतरत गव्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतू कालव्याला केलेल्या अस्तरीकरणामुळे त्यांना वर चढता येत नव्हते .
ग्रामस्थांनी गव्यांना अस्तरीकरण नसलेल्या मुरुमाच्या ठिकाणापर्यंत हुसकावून नेले. त्यानंतर हे गवे पाण्याबाहेर पडून डोंगर भागाकडे निघून गेले. पाण्यात पडलेल्या एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सरपंच भारती पाटील व अन्य ग्रा. पं. सदस्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. यानंतर कापशीचे वनाधिकारी बी.एन. शिंदे, पी.पी. भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मोडवण, राधानगरीचे वनपाल राजेंद्र बरगे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
चार महिन्यातील दुसरी घटना
दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्यात गवा पडण्याची मागील चार महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापुर्वी २ जानेवारी रोजी असाच एक कळप उंदरवाडी गावच्या हद्दीत कालव्यात पडला होता. त्यावेळी कळपातील सर्व सहा गवे सुखरुपपणे बाहेर पडले होते.परंतू आजच्या घटनेत एका गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.