प्रतिनिधी / कागल
दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याची पाणी योजना झाली तर कागल शहरवासियांच्या पिण्याचा व शेतीचा पाणीप्रश्न्न गंभीर होणार आहे. ही योजना कागल शहरवासिय व शेतकऱ्यांना मारक असलेने कोणत्याही परिस्थितीत ती होऊ देणार नाही. त्यासाठी लढा देऊ प्रसंगी रक्त सांडू, असा इशारा शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी दिला. दूधगंगा नदी बचाव कृती समितीच्यावतीने शेतकरी व नागरिकांचा योजनेस विरोध दर्शविण्यासाठी दूधगंगा नदीच्या पात्रात केलेल्या धरणे आंदोलनवेळी ते बोलत होते.
माने पुढे म्हणाले, कागल शहराचा वाढता विस्तार व व्याप पाहता कागल शहराला भविष्यात पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी लागणार आहे. तसेच दूधगंगा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालवे अद्यापही पूर्ण झालेले झालेले नाहीत. हे कालवे पूर्ण झाले तर तो ही पाणी वापर वाढणार आहे.नैसर्गिक आपत्तीत अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास धरणात जमा होणारा पाणीसाठा हा पिण्यासाठीच राखीव ठेवला जातो. त्यावेळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना ही पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे या योजनेला आमचा विरोध आहे. याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा संघर्षात कागल शहर सगळ्यात पुढे असेल .
यावेळी बाजार समितीचे माजी चेअरमन बाबगोंडा पाटील म्हणाले, काळमवाडी धरणाची क्षमता 28 टि एम सी आहे.प्रत्यक्ष ते 25 टीएमसी इतकेच भरते. पाणी वाटप करारानुसार त्यापैकी चार टीएमसी पाणी कर्नाटक राज्याला द्यावे लागते. तर 9.5 टीएमसी पाणी पंचगंगा नदीत सोडावे लागते. या पाण्यापैकी पंधरा टक्के पाणी पिण्यासाठी राखीव आहे. त्याचा हिशोब धरला तर 3.66% टीएमसी राखीव साठ्यातून जवळपास तीन टीएमसी पाणी प्रत्यक्षात पिण्यासाठी देण्यात आले. त्यामुळे पिण्यासाठी राखीव असणारे पाणी शिल्लकच नाही .मग
इचलकरंजी वासियांना पाणी कोठून द्यावयचे ?
यावेळी आप्पासाहेब भोसले, रामगोंडा पाटील ,पंडीत चव्हाण,मारूती मदारे, राजेंद्र जाधव राजाराम निंबाळकर, विशाल पाटील,दीपक मगर प्रविण गुरव, नंदकुमार माळकर, आप्पासाहेब हुच्चे प्रमोद कदम अजितसिंह घाटगे संभाजी नाईक युवराज पसारे, जयंत रावण नगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली भुरले, लक्ष्मीबाई सावंत, विजया निंबाळकर,नम्रता कुलकर्णी जयश्री कोरवी , नदिमा बुखारी, रेवती बरकाळे, जिल्हा ग्राहक मंच चे सदस्य अनिल जाधव ,पाणी पुरवठा संस्थेसह इतर शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिशाभूल करून पाणी उचलण्याचा प्रयत्न.
कागल शहराची लोकसंख्या 42 हजार इतकी असून कागल शहरासाठी दररोज 82 लाख लिटर पाणी लागते. यातील 50 लाख लिटर दुधगंगा नदीतून तर 32 लाख लिटर जयसिंगराव तलावातून पाणी पुरवले जाते.तलावातील पाणी संपताच पूर्ण 82 लाख दुधगंगा नदीतून पाणी घेणे जाते.याचाच अर्थ 1 ते दीड टी एमसी पाणी कागल साठी लागते .इचलकरंजी ची लोकसंख्या साडेतीन लाख आहे.मग त्यांना अर्धा टीएमसी वर कसे भागेल.दिशाभूल करून हा पाणी नेण्याचा प्रयत्न आहे तो नक्कीच हाणून पाडू.असा इशारा माने यांनी यावेळी दिला.