मांढरदेवला भाविकांची होतेय गर्दी
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अजून मंदिरे सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही.देवाचे देऊळ बंद असले तरी भक्तांना कोण अडवणार.भक्त देवाच्या देवळात न जाता बाहेरून दर्शन घेऊन परत येत असल्याचे चित्र वाई तालुक्यातील मांढरदेवच्या काळूबाई मंदिरात होत आहे.गेली सात महिने येथील नारळ, खण विक्रीची दुकाने बंद असल्याने दुकानदारांनी सात महिन्यात मिळेल ते काम केले.काहींची चूल बंदच होती.गेल्या पंधरा दिवसापासून भक्त निवास परिसरात तात्पुरती दुकाने थाटली गेली आहेत.वाई पोलीस आले तर आले नाही तर सर्वच आलबेल येथे असते.
कोरोना मंदिरात भक्तांची गर्दीमुळे वाढेल या भीतीने राज्य सरकारने मंदिरे अजून बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जिह्यातील सर्व मंदिरे कुलूप बंद आहेत. वाई तालुक्यातील गणपती मंदिर, मांढरदेवची काळूबाई असेल,औंधची यमाई असेल निवकणेची नवलाई असेल अशी मंदिरे बंदच आहेत.वाई तालुक्यातील मांढरदेव या मंदिराला राज्यभरातून लाखो भक्त येत असतात.सध्या मंदिर बंद असले तरीही येणारे भाविक काही थांबत नाहीत.आवर्जून काळूबाईच्या दर्शनासाठी येतातच.मुख्य प्रवेशद्वार बंद असले तरी आपत्कालीन मार्गाने जाऊन आतमध्ये जातात.देवाला नारळ वाहतात.भक्तांची गर्दी होत आहे.
गेली सात महिने दुकाने बंद
गेली सात महिने प्रशासनाच्या आदेशानुसार येथील दुकाने बंद ठेवली आहेत.तब्बल 350 दुकाने असून एका दुकानाची विक्री हजाराच्या पटीत होत असते.किरकोळ विक्रेत्यास दिवसाकाठी पाचशे रुपये सुटतात.मात्र, कोरोनामुळे दुकान बंद झाल्याने त्यांना मिळेल ते काम करावे लागले होते.गेल्या पंधरा दिवसापासून ही दुकाने खाली भक्त निवासच्या परिसरात तात्पुरती सुरू करण्यात आली आहेत.