वृत्तसंस्था/ बेंगळूर
14 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी चेन्नईत झालेल्या सलामीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचा 2 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी देणाऱया कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चँलेजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाच्या देवदत्त पडिक्कलला थेट प्रवेश दिला गेल्याने स्पर्धेत सहभागी अन्य प्रँचायझींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना संदर्भातील बीसीसीआयच्या नियमानुसार जैविक सुरक्षा कवचमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूंला सात दिवसांच्या कालावधीसाठी सक्तीचे क्वारंटाईन आहे. मात्र, देवदत्त पडिक्कलला संघाच्या सुरक्षा कवचमध्ये थेट प्रवेश देण्यात आला. आश्चर्य म्हणजे त्यापूर्वी पडिक्कल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने तो आपल्या घरीच क्वारंटाईनमध्ये होता. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर देवदत्त आरबीच्या सराव शिबिरात थेट दाखल झाल्याने इतर प्रँचायझी नाराजी आहेत.
आरसीबीच्या जैविक सुरक्षा कवचमध्ये प्रवेश करण्यापूर्वी देवदत्त पडीकलला सात दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात का आले नाही, असा प्रश्न इतर सर्व प्रँचायझींनी उपस्थित केला आहे. 7 एप्रिल रोजी देवदत्त पडीकल चेन्नईत आरसीबीच्या जैविक सुरक्षा कवचमध्ये दाखल झाला होता. तत्पूर्वी बेंगळूरहून देवदत्तने चेन्नईपर्यंत खासगी मोटारीतून प्रवास केला होता. चेन्नईत दाखल झाल्यानंतर देवदत्तच्या दोन कोरोना चाचणी घेण्यात आल्या आणि त्यामध्ये तो निगेटिव्ह असल्याने त्याला संघाच्या जैविक सुरक्षा कवचमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आल्याचे या संघांच्या व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले आहे.