जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत दिले निवेदन : विविध योजना लागू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
देवदासींचे पुनर्वसन करावे, देवदासींच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेले प्रयत्न हे अपुरे पडत आहेत. पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी तसेच देवदासींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी विमुक्त देवदासी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कन्नड साहित्य भवन येथून वाद्याच्या साहाय्याने हा मोर्चा काढण्यात आला. एक प्रकारे चित्ररथ मिरवणूकच भासत होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाटय़ प्रयोगातून देवदासींच्या जीवनाचा प्रवास दाखविण्यात येत होता. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
देवदासींचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, देवदासींच्या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे आणि नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
पेन्शनमध्ये वाढ करा
सध्या देवदासींना केवळ 1500 रुपये पेन्शन दिली जाते. ती किमान 20 ते 21 हजार रुपये द्यावी, अशी मागणी करण्यात आली. महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार करावा आणि कायद्यानुसार आम्हाला योजना लागू कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी चंदालिंग कलाल बंडी, एम. आर. बेरी, शोभा गस्ती, वाय. सुशिलम्मा, फकिराप्पा तळवार, गोपी बळ्ळारी, अजित मादार यांच्यासह महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.