ऑनलाईन टीम / पुणे :
ज्यांना दोन वेळचे जेवण मिळण्याची देखील भ्रांत आज कोरोनाच्या काळात सतावत आहे, अशा बुधवार पेठेतील देवदासी भगिनी, त्यांची मुले आणि रुग्णालयातील गरजू रुग्णांना गणेश जयंतीचा महाप्रसाद देण्याचा अनोखा उपक्रम सिटी पोस्टाजवळील महाराष्ट्र तरुण मंडळातर्फे करण्यात आला. बुधवार पेठेतील सुमारे ४०० देवदासी महिला, कमला नेहरु रुग्णालयातील २०० रुग्ण आणि मंडळाच्या आजूबाजूच्या ८० चिमुकल्यांना खाद्यपदार्थ देण्यात आले.
यावेळी शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा तावडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, उदय जगताप, दिलीप गिरमकर, उल्का गुंजाळ, ज्योती कट्टीमणी आदी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज येळवंडे, अमर गायकवाड, इम्तियाज इनामदार, जमिर शेख, श्रीराम सुद्रिक, समीर शेख, हनुमंत शिंदे, राजेंद्र शिंदे, सिद्धार्थ रणधीर, किरण फुटाणे, संतोष भूतरकर, अक्षय शिंदे, महेश इंडे, अतुल शिंदे, मंदार पाटील, आकाश शिंदे, राजेश जाधव, विवेक शिंदे, राजू सय्यद, सलीम झेंडेवाले आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
पृथ्वीराज येळवंडे म्हणाले, दरवर्षी सामान्यांकरीता गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. त्यामुळे हा सामान्य नागरिकांसाठी असलेला महाप्रसाद रद्द करुन ४०० देवदासी महिलांना भोजन, २०० रुग्णांना आणि ८० चिमुकल्यांना फळे असे खाद्यपदार्थ देण्यात आले. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन ही मदत दिली आहे.