सध्याच्या कठीण कोरोनाकाळात अनेक कोरोनाग्रस्तांना एकाकी जीवन जगावे लागत आहे. त्यांचे नातेवाईक किंवा जवळचे आप्तस्वकीय यांनीही त्यांना टाकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुद्धा जवळचे नातेही पुढे येत नाहीत. अशा स्थितीत दिल्लीतील चिरंजीव मल्होत्रा हे ऍम्ब्युलन्सचालक त्यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत.
गेल्या दीड वर्षाच्या कोरोना उदेकाच्या काळात त्यांनी हजारो रुग्णांना स्वतःच्या जबाबदारीवर धोका पत्करून रुग्णालयात पोहोचविले. कोरोना झालेल्या व्यक्तीच्या जवळपासही जाण्यास त्यांचे नातेवाईक तयार नसताना चिरंजीव मल्होत्रा यांनी अशा रुग्णांना जो आधार दिला त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. दिल्लीतील करोलबाग येथे वास्तव्यास असणाऱया मल्होत्रा यांनी हे काम करीत असताना पैशांची अपेक्षाही ठेवली नाही. कित्येकदा स्वतः पदरमोड करून त्यांनी गरजवंत कोरोना रुग्णांना उपचार मिळतील, अशी व्यवस्था केली. यामुळे त्यांना ऍम्ब्युलन्स मॅन या आपुलकीच्या नावाने ओळखले जाऊ लागले आहे.
अनेक संस्थांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे. 21 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या हस्ते विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना संत ईश्वर सन्मान प्रदान करण्यात आला. रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याचे कामच नव्हे तर कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे कामही त्यांनी केले आहे. गेल्या दीड वर्षात त्यांनी जवळपास दहा हजार कोरोनाग्रस्त मृतांचा अंत्यसंस्कार केला असल्याचे सांगण्यात येते. यामध्ये जास्त करून असे रुग्ण होते की ज्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईकही मृतदेह स्वीकारण्यास पुढे आले नाहीत. रुग्णालयातून मृतदेह स्मशानापर्यंत नेण्याचे कार्य त्यांनी दिवसरात्र केलेले आहे. इतकेच नव्हे तर अनेक रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन आणि औषधेही आणून दिली आहेत. एकंदर कोरोनाच्या या आव्हानकाळात ते अनेकांसाठी देवदूत ठरलेले आहेत, अशी प्रतिक्रिया दिल्लीत व्यक्त होत आहे.