प्रतिनिधी / मालवण:
गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या मसुरकर जुवा बेटावरील बंधारा आणि देवबाग जिओ टय़ूब बंधाऱयाप्रश्नी भाजपने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला. पतन विभागाच्या अधिकाऱयांवर प्रश्नांचा भडिमार करीत जाब विचारला. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी योग्य आहेत. त्यामुळे ठेकेदाराचे बिल अदा करणार नसल्याचे पत्रच पतन विभागाच्या अधिकाऱयांनी दिले.
मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावर पतन विभागाने धूपप्रतिबंधक बंधारा बांधला आहे. मात्र, लोकवस्ती एकीकडे आणि बंधारा दुसरीकडे, असा आरोप करीत ग्रामस्थ आक्रमक झाले. गेले अनेक दिवस हा बंधारा चर्चेत आहे. तर देवबाग येथील जिओ टय़ूब फुटल्याचा विषयही पंचायत समिती सभेत गाजला होता. या दोन्ही प्रश्नी भाजप पदाधिकाऱयांनी पतन विभागाच्या अधिकाऱयांनी जाब विचारला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, विलास हडकर, बाबा परब, अवि सामंत, विक्रांत नाईक, भाऊ सामंत, संतोष कोदे, संतोष गावकर यांच्यासह मसुरे, देवबाग येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
मसुरकर जुवा बेटावरील बंधाऱयाची पाहणी केली काय? लोकांसाठी बंधारा मंजूर असताना लोकवस्ती सोडून बंधारा का बांधला? लोकांना आणि लोकांच्या घरांना संरक्षण देण्यासाठी बंधारा होता की माड बागायती वाचविण्यासाठी बंधारा होता? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर यांनी केला. पावसाळ्य़ात लोक जीव मुठीत धरून बेटावर राहतात. उद्या काही जीवितहानी झाली, तर तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. बंधारा कुठे मंजूर होता, किती निधी होता, तो कसा बांधायचा होता, याची सर्व माहिती आम्ही माहिती अधिकारात घेतली आहे. आज शासनाचा कोटय़वधी निधी फुकट घालवलात. हाच निधी त्या लोकांना दिला असता, तर त्यांनी घरं तरी बांधली असती. ठेकेदाराला वाचवण्याचं काम पतन विभाग करीत आहे. ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी भाजपने केली.
जिओ टय़ूब गेल्या वाहून
देवबाग येथील जिओ टय़ूब बंधाऱयाच्या टय़ूब फुटल्या कशा? बंधाऱयाचे किती टक्के काम झाले आणि किती रक्कम ठेकेदाराला दिली? त्यातील किती टय़ूब वाहून गेल्या? असा सवाल करण्यात आला. त्यावर अधिकाऱयांनी एकूण 80 टक्के काम झाले आहे. एकूण 22 टय़ूब घातलेल्या असून त्यातील आठ टय़ूब आहेत. शिवाय एक कोटीच्या आसपास ठेकेदाराला रक्कम देण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. यावर भाजप पदाधिकारी संतप्त झाले. ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी बंधाऱयाच्या कामाबाबत तक्रारी केल्या आहेत. ग्रामस्थांची तक्रार असताना ठेकेदाराला बिले दिलीच कशी? कोणाच्या सांगण्यावरून ठेकेदाराला बिल अदा केले? यापुढे एकही बिल अदा करू नये. शिवाय झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी अशोक सावंत यांनी केली. या दोन्ही प्रश्नावर आमदार नीतेश राणेंच्या माध्यमातून अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
बिल अदा करणार नाही!
भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर पतन विभागाचे अधिकारी बोथिकर यांनी मसुरकर जुवा बेटावरील बंधाराप्रश्नी ग्रामस्थांची तक्रार ही खरी आहे. त्यामुळे ठेकेदाराचे बिल अदा करणार नाही. शिवाय देवबाग बंधाऱयाचेही उर्वरित बिल अदा करणार नसल्याचे पत्र भाजप पदाधिकाऱयांना दिले.