मनाने हरीचे ध्यान करावे, कानाने त्याची कीर्ती सतत ऐकावी, जिभेने नामस्मरण करावे, हाताने हरीची पूजा करावी, पायाने मंदिराची वाट चालावी, हरिचरणी वाहिलेल्या तुळशींचा नाकाने वास घ्यावा, निर्माल्य मस्तकावर धारण करावे म्हणजे त्याबद्दल पूज्य भाव असावा, तीर्थ व हरिप्रसाद पोटात घ्यावा. याप्रमाणे इंद्रियांचे वर्तन चालू ठेवावे म्हणजे सद्भाव वाढू लागतो, प्रेम प्रकट होऊ लागते व अखंड भजन घडू लागते परिणामी संसार बंधनातून सुटका होते. स्वतः भगवंतानी सांगितले आहे की, मी भक्तीच्या आधीन आहे आणि केवळ भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. वेद शास्त्रांचा अभ्यास केला नसला तरी भागवतधर्माला जो भक्तीने अनुसरतो त्याचे सर्वस्वी कल्याण होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार इत्यादी भगवंतांच्या चरणी अर्पण करणे इथूनच भागवतधर्माची पताका रोवली जाते. दिवसेंदिवस भक्ताच्या मनामध्ये भगवंताबद्दलचे प्रेम वाढतच जाते आणि आत्मबोधाच्या योगाने मनामध्ये पुरुषोत्तम प्रगट होतो. एकनाथी भागवताचा दुसरा अध्याय आपण अभ्यासत आहोत. नारदमुनी भागवताचा इतिहास सांगत आहेत.
जनक राजांनी विचारल्यावर, काय केले म्हणजे माणसाचे आत्यंतिक क्षेम म्हणजेच सर्वात जास्त कल्याण होईल हे सांगताना अर्षभ कवी म्हणाले, ‘मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार भगवंतचरणी आपल्या सर्वस्वासह अर्पण करा.’ आपल्या सर्व इंद्रियांनी भगवतभक्ती कशी करावी हे सांगताना ते म्हणाले, ‘या भक्तीच्या माध्यमातून भगवंतावरील उत्कट प्रेमाने आपले सर्वस्व भगवंतांना अर्पण करायचे आहे. आपली सर्व इंद्रिये प्रभूची भक्ती करू लागली की त्यांच्या हालचाली कसकशा होतात ते पाहू, मन सदा भगवंतांच्या भजनी लागले की, भगवंत सोडून इतर कोणतेही विचार मनात यायचे बंद होते. म्हणजेच आपल्याला भगवंताचा ध्यास लागतो आणि मग ज्याचा ध्यास त्याचाच भास सर्वत्र होत राहतो. भक्त स्वतःच देवरूप होतो.’ श्री गोंदवलेकर महाराज रामाचे भक्त होते. त्यांना सर्वत्र रामच दिसत असे. म्हणून ते सगळय़ांना सांगत की, ‘मला तुम्ही सगळे रामरूपच दिसता!’ कारण सततच्या भजनाने ते स्वतः रामरूपच झाले होते. तसे देवरूप भक्ताला सगळीकडे देवच दिसतो. म्हणतात ना ‘शिवं भुत्वा शिवं यजेत’ तसेच आहे हे! याला म्हणायचे मनाचे अर्पण! आता एकदा मन देवरूप झाले की त्याचा प्रभाव इंद्रियावरही पडतो आणि त्यांच्या हालचालीसुद्धा त्यानुरुप होऊ लागतात. डोळय़ांना समोरील वस्तू आहे त्या स्वरूपात न दिसता देवरूपच दिसते. हे दृष्टीचे अर्पण होय! कान कसे ब्रह्मार्पण होत असतील? तर जो बोलवणारा असतो तोच ऐकण्यासाठी कानात बसलेला असतो. म्हणजेच बोलणारा आणि ऐकणारा एकच म्हणजे परमेश्वर! समजा तुम्ही जप करत आहात तर जप करून घेणारा देवच आणि ऐकणारही देवच. डोळे आधीच अर्पण झालेले आहेत. ते देवाची मूर्त नजरेसमोर उभी करतात. म्हणून कान आणि वाणी एकदमच अर्पण होतात.
क्रमशः