सोशल मीडियावर व्हायरल अनेक व्हीडिओंसाठी याच गाण्याची पसंती : गाण्याची निर्मिती सिंधुदुर्गच्या सुपुत्रांची
- गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार विजय
गवंडे यांची तरुण भारतशी खास बातचित
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या आपत्तीमुळे संपूर्ण मानवजात भयकंपित झाली असताना आता प्रत्येकजण कशा ना कशात आधार शोधू लागला आहे. मराठी माणसाची मनस्थिती देखील फारशी वेगळी नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘देवाक काळजी रे’ अशी हाक सोशल मीडियावरून दिली जातेय. काळजी वाढवणाऱया अथवा दिलासा देणाऱया सोशल मीडियावरील अनेक व्हीडिआंsना पार्श्वसंगीत म्हणून ‘देवाक काळजी रे..’ हे गीत लावलेले आढळून येत आहे. अनेकांनी आपल्या मोबाईल रिंगटोनला देखील या परिस्थितीत याच गाण्याला पसंती दिलेली दिसून येत आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराच्या आपत्तीत देखील अनेक भयग्रस्त मनांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना याच गाण्याचा आधार घेतला होता. यावेळी देखील हेच गाणे पुन्हा एकदा अनेक मनांवर आशेची फुंकर घालताना दिसत आहे.
‘सोबती रे तू तुझाच.. अन् तुला तुझीच साथ।
रात संपता पहाट.. होई रे पुन्हा।।
येईल दिवस तुझारे माणसा.. जिगर सोडू नको।
तुझ्या हाती आहे डाव सारा.. इसार गजाल कालची रे।।’
गाण्याचा अनोखा विक्रम
‘देवाक काळजी रे..’ या गाण्यातील हे बोल, किंबहुना संपूर्ण गाणेच सध्याच्या परिस्थितीत काळजाला भिडणारे आहे. महत्वाचे म्हणजे भयग्रस्त समाजाच्या मनाला आशेची फुंकर घालणाऱया या गीताची रचना करणारा गीतकार व या गाण्याला सुरेख चाल देऊन ते संगीतबद्ध करणारा संगीतकार हे दोघेही सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत. या अजरामर गीताची निर्मिती प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर, जो म्हापण गावचा सुपुत्र आहे याने केली आहे. तर हे गाणी संगीतबद्ध केले आहे, तो संगीतकार विजय गवंडे हा वालावल गावचा सुपुत्र आहे. हे गाणे या पूर्वी यूटय़ूबवरून सुमारे दहा कोटी लोकांनी ऐकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांशी संवाद साधला असता त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाही मनाला भिडणाऱया आहेत.
डोळ्य़ात अश्रू उभे राहतात – गुरु ठाकुर
गुरु ठाकुर ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, खरं तर या गीताची निर्मिती एका वेगळय़ा क्षणी झाली आहे. ‘रेडिओ’ या मराठी चित्रपटासाठी माझे मित्र विजय गवंडे यांनी एक गाणं माझ्याकडे बनवून मागितलं होतं. रेडिओ हरवलेल्या एका सामान्य माणसाची व्यथा या गाण्यातून मांडायची होती. मला काही केल्या गाण्याची रचना सुचत नव्हती आणि विजयचे फोन सारखे-सारखे येत होते. एक दिवस विजयने मला आठवणीसाठी फोन केला. मी त्याला बघतो रे.. असे नेहमीचे उत्तर दिलं. शेवटी वैतागलेल्या विजयने मालवणी भाषेतच ‘काय तुका सांगतलंय आता. आता देवाकच काळजी’ असं म्हणून फोन ठेवून दिला. विजयने निराशेच्या भरात ‘देवाक काळजी’ म्हणत काढलेले उद्गार मला चटकन अपिल झाले. मी दुसऱया क्षणी विजयला कॉल करून ‘देवाक काळजी या वाक्यावरच गाणं बनवून देऊ का?’ असं विचारलं. त्याला ती मस्करी वाटली. त्याने पुन्हा फोन ठेवून दिला. मात्र पुढच्या अर्ध्या तासात ‘देवाक काळजी’ हे वाक्यच घेऊन या संपूर्ण गीताची निर्मिती झाली. मात्र हे गीत बनवल्यानंतर ते ऐवढे हिट होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा, मात्र लोकांना ते निश्चितच आवडेल याची खात्री होती. पुढे या गीताला विजयने अतिशय उत्कृष्ट असे संगीत देत सर्वोत्कृष्ट साज चढवला. तर गायक अजय गोगावले याने जीव ओतून हे गाणे म्हटले आणि त्यानंतर ‘न भुतो न भविष्यती’ असा प्रतिसाद या गाण्याला मिळाला. अनेक पुरस्कार या गाण्याला मिळाले. हे गाणे चित्रपटापुरते मर्यादित न राहता ते खऱया अर्थाने युनिव्हर्सल बनले. प्रत्येक माणसाला ते स्वत:च्या जीवनातील गाणे वाटते. यापूर्वी देखील ‘खेळ मांडला’ हे माझे गाणे देखील अशाच कठीण परिस्थितीत लोकांना आपलेसे वाटले होते. सद्यस्थितीत सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱया वेगवेगळय़ा दृश्यांना ‘देवाक काळजी’ या गाण्याची साथ दिली जात आहे. ते व्हीडिओ या गाण्यासह पाहतांना माझ्याही डोळय़ात कधीकधी अश्रू उभे राहतात.
परमेश्वराचा मी आभारी – विजय गवंडे
विजय गवंडे यांनीही व्यक्त केलेल्या भावना काही अशाच आहेत. तरुण भारतशी व्यक्त होताना ते म्हणाले, ‘हे गाणे बनवताना ते भविष्याकडे आशा लावून बसलेल्या सर्वसामान्य माणसाचे गाणे होईल आणि या गाण्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल, असे आपणास स्वप्नातही वाटले नव्हते. गाण्याची निर्मिती झाल्यानंतर ते लोकांना आवडेल एवढंच आम्हाला वाटलं होतं. पण त्यानंतर या गाण्याला मिळालेला प्रतिसाद हा ‘न भुतो न भविष्यती’ असाच आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, हे गाणे ऐकून येणाऱया प्रतिक्रिया एवढय़ा भावनात्मक असतात की, काहीजणांनी तर थेट या गाण्याने आम्हाला आत्महत्येपासून परावृत्त केले, या गाण्याने आम्हाला जगण्याची नवी उमेद दिली, असे सांगितले. भविष्यात देखील नवी उमेद जागवणाऱया अशाच प्रकारच्या गाण्यांची निर्मिती माझ्या हातून घडो, एवढीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना. माझ्या या गाण्याच्या निर्मितीत माझ्याबरोबरच हे गाणे लिहिणाऱया गीतकार गुरु ठाकुर व आपल्या सुंदर आवाजाने हे गाणे अजरामर करणाऱया गायक अजय गोगावले यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.