अध्याय अकरावा
उत्तम भक्ताबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, जो माझे भजन करतो, तो माझ्यामध्ये व मी त्याच्यामध्ये राहतो. सर्व भक्तांमध्ये तोच उत्तम भक्त होय. साधु असे नाव त्यालाच शोभते. माझे विश्रांतीचे अकृत्रिम स्थान तोच असतो. त्याच्यासाठी मी स्वतः सर्वांगाचे आंथरूण करतो आणि पावलोपावली मी त्याच्यावरून आपल्या जीवाचे निंबलोण उतरवतो. हे उत्तम भक्ताचे लक्षण सांगतांना देवही प्रेमाने वेडे झाले. त्याना धीर निघेना. त्यानी उद्धवास कडेवर घेतले आणि ते आनंदाने नाचू लागले. तेव्हा विस्मयाने उद्धवाचाही गळा भरून आला. मी देव आणि हा भक्त हेही श्रीकृष्ण विसरून गेले आणि हा देव आणि मी भक्त हा भाव उद्धवातही उरला नाही. अशा भक्तीच्या साम्राज्यात दोघांची एकरूपता झाली. कृष्णनाथाला जे प्रेमाचे भरते आले होते ते त्याने आवरले आणि उद्धवाला हाताने थोपटून श्रीकृष्णाने त्याला सावध केले. कोणी मला जाणून माझे भजन करतात आणि कोणी केवळ भावार्थानंच मला भजतात. पण मी त्या दोघांच्याही भक्तीला भुलतो आणि ते दोघेही माझे आवडते असतात. सत्य, ज्ञान व अनंतस्वरूप परब्रह्म ते मीच असे जाणून जे मला भजतात, तेच उत्तम भागवत होत हे लक्षात ठेव. आता तू म्हणशील की, शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर भजन कसे करावयाचे ? तर ते मी तुला सविस्तर सांगतो. भक्ताला शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर देव आणि भक्त दोन्ही एकच होऊन भजन करतात. असे बघ की, डावे आणि उजवे हे भाग जरी दोन असले, तरी अंग एकच आहे. त्याप्रमाणे देव आणि भक्त हे विभाग माझ्या स्वरूपातच पूर्णपणे दिसून येतात. आरसा साफ केला म्हणजे तो चंद्र, सूर्य आकाश, पृथ्वी यांची प्रतिबिंबे आपल्यामध्ये धारण करतो. हे त्याच्याकडून सहजच घडत असते. त्याप्रमाणे माझे भक्तही माझ्यातच सामावून अनन्यभावाने माझेच भजन करतात, तेव्हा माझे सारे वैभव त्यांच्यामध्येच प्रतिबिंबित होत असते.
किंवा समुद्रात लाटा असतात त्यांना जसे खाली व वर पाणीच असते, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्यामध्येच असल्यामुळे अंतर्बाह्य मद्रूपच असतो. ज्याप्रमाणे नृसिंहाची मूर्ति सोन्याची केली म्हणजे ती सुवर्णाच्याच हिरण्यकश्यपूचे विदारण करीत असते आणि सोन्याचाच प्रल्हाद पोटाशी धरते, त्याप्रमाणेच माझ्या भजनाची स्थिति आहे. तेथे सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपे मीच असतो. तेव्हा डोळय़ांनी भक्त जे जे पाहील तेथे तेथे माझेच स्वरूप त्याला दिसू लागते आणि तो तत्काळ मत्स्वरूपालाच मिळतो.
हे लक्षात घेऊन जे माझे भजन करतात, तेच भक्त उत्तम होत हे लक्षात ठेव. अशाच प्रकारे मला न जाणताही जे माझे भजन करतात, ते माझे भोळे भक्त होत. तशा भोळय़ा भक्ताने वेदाचे पठण केलेले नसते, वेदांतशास्त्र ऐकलेले नसते, त्याला विकल्पाचे लक्षण नसते, तर तो केवळ अनन्य भावार्थी असतो. त्याला सगुण निर्गुण कळत नाही, पण हृदयामध्ये देव आहे असे तो म्हणतो. देहाच्या ठायी जडत्व आहे. म्हणून देव त्याच्यात चैतन्य आणतो. देहाचे जे चलन होते, ते हृदयस्थ नारायण करवितो. तसेच डोळय़ांचे जे पहाणे तेही त्याच्यामुळेच होते असे समज. कारण आपला डोळा काढून तो दूर वेगळा ठेवला, तर हृदयस्थ नारायण तेथे नसल्यामुळे तो आंधळाच होतो. म्हणून पाहण्याची कलाही देवाचीच होय. जीभ केवळ चामडय़ाची आहे. तिला रसाची चव काय कळणार ? तिला कापून टाकले तर ती बिचारी गोडी-अगोडी काहीच जाणत नाही. म्हणून जिव्हेच्या द्वारे रसस्वाद घेणाराही हृदयस्थ परमात्माच होय. तसेच बुद्धीला ज्ञान देणाराही खरोखर हृदयातील नारायणच होय. मनाचे जाणेयेणेसुद्धा त्या हृदयस्थाच्याच आधीन असल्याचे दिसते. म्हणूनच मन दूर गेले तरी ते परत फिरते आणि पुन्हा हृदयातच येते. इंद्रियांना प्रेरणा करणारा किंवा आवरून धरणारा सत्ताधारी हृदयस्थाच्याच आधीन आहे. म्हणून त्याला ‘हृषीकेश’ (म्हणजे इंद्रियांचा स्वामी) असे म्हणतात. अशा विचाराने पाहिले म्हणजे आपल्या हृदयांतच देव असल्याचे दिसून येते आणि गम्मत म्हणजे त्याला पहायला मनुष्य बाहेर धाव घेत असतो.
क्रमशः