अष्टमीनिमित्त घागरी फुंकण्याचा कार्यक्रम : बेळगावात अनेक ठिकाणी परंपरा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात नवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने सुरू आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीदिवशी घागरी फुंकल्या जातात. शहरात ही परंपरा काही घरांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे. देशपांडे गल्ली येथील परांजपे यांच्या घरी 84 वर्षांपासून घागरी फुंकल्या जातात. रविवारी रात्री उभ्या महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली आणि घागरी फुंकण्यात आल्या.
या परंपरेची सुरुवात केशवराव साठे, दातार व कृष्णा परांजपे यांनी देवीचा मुखवटा करून केली होती. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, या इच्छेपोटी परांजपे कुटुंबातील एका व्यक्तीने दुर्गाष्टमीचा नवस केला. तेव्हापासून अष्टमीच्या पूजेची परंपरा आजही सुरू आहे. अष्टमी लागली की पूजेची तयारी सुरू होते. खास तयार केलेल्या तांदळाच्या पिठाचा मुखवटा तयार केला जातो. त्यावर नाक, डोळे रेखून भरजरी वस्त्र देवीला नेसविले जाते. सकाळी देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
मंगळागौरीप्रमाणेच ज्या नवविवाहितांच्या विवाहाला पाच वर्षे पूर्ण व्हायची आहेत, त्यांना देवीच्या पूजेचा मान मिळतो. सायंकाळनंतर घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो. घागरी फुंकणाऱया महिलांना अनेक जण आपली अडचण सांगतात. काही ठिकाणी पुरुषही घागरी फुंकतात. रविवारी परांजपे कुटुंबीयांतर्फे घागरी फुंकण्यात आल्या.
यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. घागरी फुंकणाऱया महिला व पुरुषांकडे आपल्या अडचणी विचारून घेतल्या. त्यांनी सांगितलेले भाकित खरे होते, अशी श्रद्धा आहे. कचेरी गल्ली, शहापूर येथील मिलिंद बापट यांच्या निवासस्थानीहीघागरी फुंकण्यात आल्या. तेथेही भाविकांची गर्दी झाली होती. रात्री बारापर्यंत घागरी फुंकण्यात आल्या, तोपर्यंत दर्शनासाठी लोक येत होते.